प्रदीर्घ कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्याची सुवर्णसंधी भारताने वाया घालवली आहे. सेंच्युरिअन कसोटी सामन्यात बाजी मारल्यानंतर डीन एल्गरच्या दक्षिण आफ्रिकन संघाने दमदार पुनरागमन करत जोहान्सबर्ग आणि केप डाऊनचा गड सर करत मालिकेत २-१ ने बाजी मारली आहे. चौथ्या दिवशी आफ्रिकेने विजयी लक्ष ७ गडी राखून पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
दुसऱ्या डावात प्रमुख भारतीय फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताने विजयासाठी २१२ धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने यातलं अर्ध आव्हान सर करत २ विकेट गमावत १०१ धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात डीन एल्गरच्या विवादास्पद निर्णयानंतर भारतीय संघ सामन्यात पूर्णपणे बॅकफूटला फेकला गेला.
चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज नव्या जोशाने मैदानात उतरतील अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा होती. परंतू प्रत्यक्षात असं काही झालं नाही. किगन पिटरसर आणि डसेन जोडीने भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत आफ्रिकेचं पारडं जड केलं. पिटरसनने ८२ धावांची खेळी करत आपली उपयुक्तता सिद्ध केली. ही जोडी आफ्रिकेला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने पिटरसनला क्लिन बोल्ड केलं.
SA vs IND: ‘सामना जिंकायचा असेल तर दुसरा मार्ग शोधा’, थर्ड अंपायरच्या ‘त्या’ निर्णयावर वादंग
लंच सेशननंतर आफ्रिकेला विजयासाठी नाममात्र धावांची गरज होती. डसेनच्या जोडीने टेंबा बावुमाने पुन्हा एकदा चांगली भागीदारी रचत भारताच्या विजयासाठीच्या उरल्या सुरल्या सर्व आशा संपवून टाकल्या. कालांतराने भारतीय खेळाडूंच्या देहबोलीतही पराभव दिसू लागला. अखेरीस बावुमा आणि डसेन जोडीने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर दोन्ही संघांमध्ये १९ जानेवारीपासून तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
ADVERTISEMENT