टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अखेरीस विजयी सूर गवसला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात करत, उपांत्य फेरीतल्या प्रवेशाची आशा कायम ठेवली आहे.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींग करताना भारताने रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर २१० धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १४४ धावांपर्यंत मजल मारु शकला.
टॉस जिंकून अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने सामन्यात दोन बदल करत सूर्यकुमार यादव आणि आश्विनला संघात स्थान दिलं. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानने ही जोडी फोडण्याचे आतोनात प्रयत्न केले, अखेरीस १५ व्या ओव्हरमध्ये त्यांना यश मिळालं.
करीम जनातने रोहित शर्माला ७४ धावांवर आऊट केलं. रोहितने आपल्या इनिंगमध्ये ८ फोर आणि ३ सिक्स लगावल्या. यानंतर लोकेश राहुलही अर्धशतक झळकावून गुलबदीन नैबच्या बॉलिंगवर आऊट झाला. राहुलने ४८ बॉलमध्ये ६ फोर आणि २ सिक्स लगावत ६९ रन्स केल्या. यानंतर कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला फलंदाजीत प्रमोशन दिलं. या दोन्ही फलंदाजांनीही कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत चौफेर फटकेबाजी करत संघाला २०० पारचा टप्पा गाठून दिला.
BCCI चा दिवाळी धमाका, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती
प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने मोहम्मद शहझादची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर बुमराहने हजरतउल्ला झजाईला माघारी धाडलं. यानंतर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू भागीदारी करण्यात अफगाणी फलंदाज अपयशी ठरले. पुनरागमनाच्या सामन्यात रविचंद्रन आश्विनने दोन विकेट घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.
T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकूनही न्यूझीलंडची चिंता कायम, भारतासाठी आनंदाची बातमी
यानंतर कॅप्टन मोहम्मद नबी आणि जनत यांनी फटकेबाजी करत अफगाणिस्तानला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतू फटकेबाजीच्या प्रयत्नात त्यांचे प्रयत्नही तोकडेच पडले. अखेरीस भारताने विजय संपादन करत स्पर्धेतली आपली आशा कायम ठेवली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने ३, आश्विनने २ तर बुमराह आणि जाडेजा यांनी १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT
