'स्वाभिमान'मुळे देशभरातील 10 लाख महिलांचे भाग्य बदलेल - डॉ. प्रीती अदानी
अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती अदानी यांनी 'स्वाभिमान' उपक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश भारतातील १० लाख महिलांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: अदानी ग्रुपच्या (Adani Group) सामाजिक कल्याण आणि विकास विभाग असलेल्या अदानी फाउंडेशनने (Adani Foundation) आपल्या प्रमुख महिला सक्षमीकरण उपक्रम 'स्वाभिमान'चा (Swabhimaan) मोठा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. अदानी फाउंडेशनच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या (11 मार्च 2026) पूर्वसंध्येला हा विस्तार जाहीर करण्यात आला असून, भारतभर 10 लाख महिला उद्योजकांना सक्षम करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ही घोषणा मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित 'स्वाभिमान – द राइज ऑफ शी' (Swabhimaan – The Rise of She) या कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांच्या उपजीविकेसाठी, उद्योजकतेसाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी 'स्वाभिमान'ने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, पहिल्या वर्षातच एक लाख महिलांना सक्षम करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, उद्योग आणि ग्रामीण स्तरावरील उद्योजकता वाढीस लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ (महिला अर्थिक विकास महामंडळ - MAVIM) सोबत सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मुंबईतील दुर्लक्षित समुदायातील 4500 हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता देऊन शाश्वत उपजीविका निर्माण करण्यास मदत केली आहे.










