सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला, मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये उत्तराधिकारी पदावरून वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी मंदिरात आरती केल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापक आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाला. नेमका हा वाद काय आहे, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला,
मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?
Sangli Patwardhan family Dispute : सांगलीतील ऐतिहासिक श्रीमंत गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव पटवर्धन राजघराण्यातील उत्तराधिकारी पदाच्या अंतर्गत वादामुळे वादग्रस्त ठरला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री व राजकन्या भाग्यश्री पटवर्धन या तब्बल चार वर्षांनंतर सांगलीत परतल्या आणि त्यांनी थेट मंदिरात जाऊन श्री गणपती बाप्पाची आरती केली. मात्र, या वेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्याशी त्यांची शाब्दिक खडाजंगी झाली. वडिलांची तब्येत ठीक नसल्याने आणि मंदिराची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी कौटुंबिक जबाबदारी म्हणून आपण सांगलीत आल्याचे स्पष्टीकरण भाग्यश्री यांनी दिले आहे.
नेमका वाद काय?
दुसऱ्या बाजूला, संस्थानाचे विद्यमान प्रमुख आणि भाग्यश्री यांचे वडील श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. विजयसिंह राजे यांनी 2023 मध्ये जयदीप अभ्यंकर यांच्या 16 वर्षीय मुलाला म्हणजेच आदित्य अभ्यंकरला दत्तक घेऊन 'युवराज आदित्य राजे पटवर्धन' म्हणून संस्थानाचा उत्तराधिकारी घोषित केले आहे. त्यामुळे हा वाद केवळ गणपतीच्या आरतीपुरता मर्यादित नसून, थेट राजघराण्याच्या उत्तराधिकारी पदावरून आणि संस्थानाच्या मालकीहक्कांवरून रंगल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; सरकारला 90 दिवसांची मुदत, 'त्या' 5 मुद्द्यांवर सरकारकडून आश्वासन
भाग्यश्री यांच्या पतीवर काय आरोप?
या वादाला 2013 ते 2016 या काळातील कौटुंबिक घडामोडींची मोठी पार्श्वभूमी आहे. भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे पूर्वी संस्थानाच्या कारभाराची जबाबदारी होती; मात्र संस्थानाच्या जमिनी परस्पर विकल्याच्या आरोपांनंतर त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यानंतर संस्थानाची सूत्रे जयदीप अभ्यंकर यांच्याकडे सोपवण्यात आली. विजयसिंह राजे यांच्या मते, संस्थानाची परंपरा आणि कारभार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी एका संस्कारित आणि ओळखीच्या घरातील मुलाला दत्तक घेतले असून, भाग्यश्री व त्यांच्या पतीने संस्थानाच्या कारभारात किंवा परंपरेत कोणताही अनावश्यक हस्तक्षेप करू नये.
हे ही वाचा : Personal Finance: ‘चल ना, आज एन्जॉय करूया!’ मित्रांसोबतच्या प्लॅनमुळे बजेट का बिघडतं?
कन्या विरुद्ध दत्तकपुत्र
गणेशोत्सवाच्या या पवित्र व मंगलमय काळात पटवर्धन संस्थानातील हा कौटुंबिक आणि संस्थानावरील हक्काचा वाद चव्हाट्यावर आल्याने सांगलीकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका बाजूला विजयसिंह राजे यांनी नियुक्त केलेले दत्तक उत्तराधिकारी युवराज आदित्य राजे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची सख्खी कन्या भाग्यश्री पटवर्धन यांच्यातील हा 'कन्या विरुद्ध दत्तक पुत्र' असा संघर्ष उभा राहिला आहे. आता या ऐतिहासिक पटवर्धन संस्थानाचा हा वाद भविष्यात कोणते नवे वळण घेणार आणि यावर दोन्ही बाजू कायदेशीर व सामाजिक पातळीवर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
