Manoj Jarange : “…ते मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगेंचं मोठं विधान
manoj jarange patil News : मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. पण, आता त्यांनी सरकारकडे 17 डिसेंबरच्या आतच भूमिका मांडावी, अशी नवी डेडलाईन दिली आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Live Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीचा पुनर्रुच्चार करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला नवी डेडलाईन दिली. जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाही मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर इशारा दिला.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “अंतरवालीत विराट सभा झाली होती. तिथेच 17 डिसेंबर रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता बैठक सुरू होईल. १२ वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही, तर काय, याबद्दल १२ ते ३ या वेळेत आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, यावर बैठक होणार आहे.”
मराठा आरक्षण टिकणार का? जरांगेंचा सवाल
“मी मागेही सांगितलं होतं की, मराठा आरक्षणाला विरोध नाहीये. पण, ते टिकेल का? मराठ्यांनी ते आरक्षण घेतलं, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि रद्द झालं. आता तेच आरक्षण मराठ्यांना मिळणार असेल, तर आम्ही स्वीकारू. पण, ते एनटी, व्हीजेएनटी सारखं टिकेल का? ते महिना किंवा वर्षभर राहणार आणि कुणीतरी कोर्टात गेल्यावर ते उडवणार. ते आरक्षण टिकेल याची खात्री काय?”, असा उलट सवाल जरांगे यांनी सरकारला केला.
हेही वाचा >> “कटोरा हात मैं लेकर, बाबा के नाम दे”, वडेट्टीवार भुजबळांवर कडाडले
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ते आरक्षण 50 टक्क्यांच्या आत घेऊन त्याचा वेगळा प्रवर्ग तयार करणार का? ते स्पष्ट करावं, आम्ही कुठे नाकारलं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनही याचं आंदोलनामुळे गेली आहे. ओबीसीतून आरक्षणही याच आंदोलनामुळे मिळत आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत”, असे सांगत जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली.