मुंबई : काळाचौकी महागणपती मंडपात मोठी दुर्घटना! चिमुकलीचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?
प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना घडली. विजेचा धक्का लागून एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, तर अन्य काहीजण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काळाचौकी महागणपती मंडपात मोठी दुर्घटना!
मध्यरात्री काय घडलं?
Kalachowki Mahaganpati Electrocution News : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलवर मध्यरात्री अचानक विजेचा धक्का लागल्याने मोठी खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत 8 ते 20 वयोगटातील पाच मुले आणि किशोरवयीनांना विजेचा धक्का बसला असून, ज्यामध्ये एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री काय घडलं?
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. रात्रीची वेळ असली तरी मंडप परिसरात भाविकांची उपस्थिती होती. अचानक मंडपात विद्युत प्रवाह पसरल्याने गोंधळ उडाला आणि दोन मुले तसेच तीन मुलींना विजेचा धक्का बसला. या अनपेक्षित घटनेमुळे मंडपात एकच गोंधळ उडाला आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
हे ही वाचा : संजय राऊत प्रादेशिक पक्षांचा उल्लेख करत राहुल गांधींची सत्ता येणार नाही, असं का बोलले?
आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
अपघातानंतर त्वरित सर्व पाचही जखमींना उपचारासाठी भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी आठ वर्षीय मुलीला मृत घोषित केले. या घटनेतील इतर जखमींपैकी एका मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने, तिला पुढील आणि अधिक चांगल्या उपचारांसाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : "दारावरची टकटक..", केंद्र सरकारच्या UPI निर्णयाबाबत राज ठाकरेंची सूचक पोस्ट
आयसीयूमध्ये उपचार सुरु
दरम्यान, मसीना रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वरित तीन जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आणि विजेच्या जोडणीची काळजी घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
