BMC Election : ‘डोळे लावून ध्यान करत होतात का?’ दानवे-शेलारांमध्ये काय घडलं?
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या टोल वसुलीवरून आता शिवसेना युबीटी-भाजप समोरासमोर आलेत. आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर अंबादास दानवेंनीही निशाणा साधला.
ADVERTISEMENT

Mumbai Politics : मुंबई महापालिका निवडणूक कधी लागणार, हे अजूनही निश्चित नसलं तरी मोर्चेबांधणी जोरात सुरूये. मुंबईतील राजकारण तापताना दिसत असून, ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप, असा कलगीतुरा बघायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील टोलचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लक्ष्य केले. शेलारांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएसआरडीसीने बृहन्मुंबई महापालिकेकडे दिले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करते. टोल मात्र एमएसआरडीसी वसूल करते, असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या मार्गावरील टोल बंद करण्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी केलीये.
आदित्य ठाकरेंनी टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी त्याला उत्तर दिलं. शेलारांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि आदित्य ठाकरेंना युवराज असा टोला लगावत पलटवार केलाय.
युवराज म्हणत आदित्य ठाकरेंना टोला
शेलारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले. मुंबईची तुंबई झाली. अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले. 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली. झाड पडून काहीजण गेले. संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले. तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा.”