
Lok Sabha Election 2024 : भाजपनं २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेल्या रणनीतीनुसार काम सुरू केलंय. भाजपकडून आता महत्त्वाच्या १५ राज्यांत प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांकडेही जबाबदारी देण्यात आलीये.
देशात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काँग्रेससह विरोधी बाकांवरील प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपनंकडूनही जोरात तयारी सुरू आहे. भाजपनं केरळसह १५ राज्यांमध्ये लोकसभेत चांगलं यश मिळवण्यासाठी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
अलिकडेच सत्तेतून बाहेर व्हाव्या लागलेल्या बिहारसह भाजपकडून १५ राज्यांत प्रभारींची जबाबदारी दिली गेलीये. यात बिहारसह छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, हरयाणा, झारखंड, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, चंदीगढ, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.
जेपी नड्डा यांनी केलेल्या नियुक्त्यांनुसार विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी, तर ओम माथुर यांना छत्तीसगढ, बिप्लब कुमार देब यांना हरयाणा, लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंड, प्रकाश जावडेकर यांना केरळ, राधामोहन अग्रवाल यांना लक्षद्वीप, पी. मुरलीधर राव यांना मध्य प्रदेश, विजय रुपाणी यांना पंजाब आणि चंदीगढ, तरुण चुघ यांना तेलंगणा, अरुण सिंह यांना राजस्थान, महेश शर्मा यांना त्रिपुरा, मंगल पांडे यांना पश्चिम बंगाल आणि संबित पात्रा यांना पूर्वोत्तरचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १५ राज्यांसाठी प्रभारी आणि सह प्रभारी नेमताना महाराष्ट्रातील चार नेत्यांवरही जबाबदारी सोपवली आहे. यात विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर यांची अनुक्रमे बिहार आणि केरळचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राजस्थानच्या सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंकंजा मुंडे यांची मध्य प्रदेशच्या सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बीएल संतोष यांनी ६ सप्टेंबर रोजी देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात भाजपची स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यासंदर्भातील रणनीतीही तयार करण्यात आली. भाजपनं लक्ष्य केंद्रीत केलेल्या १४४ जागांवर २०१९ मध्ये भाजपचे उमेदवार दुसऱ्या किंवा क्रमांकांवर राहिले होते. त्या जागांवर विजय मिळवण्याचं भाजपचं लक्ष्य आहे.