पुनश्च हरि ओम! निम्मा महाराष्ट्र निर्बंध मुक्त, नाट्यगृहं, थिएटर्स, रेस्तराँ पूर्ण क्षमतेने होणार सुरू

राज्य सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली नेमकी काय आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(फाइल फोटो - सौजन्य CMO)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही महाराष्ट्रात विविध निर्बंध लादण्यात आले होते. आता सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कोरोना आटोक्यात आला आहे. त्या अनुषंगाने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे या निर्बंधांमध्ये काही बदल केले आहेत. म्हणजेच या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नियमांमधून अनेक शिथीलता देण्यात आल्या आहेत. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मागच्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होते आहे. देशातील विविध राज्यांमध्येही रूग्णसंख्या नियंत्रणात येते आहे असंच दिसतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुनश्च हरिओम म्हणत राज्य सरकारने अनलॉक संदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या 14 जिल्ह्यांमध्ये सिनेमागृहं, नाट्यगृहं तसेच रेस्तराँ पूर्ण क्षमेतेने उघडावीत असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

१४ जिल्हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निकष तयार केले आहेत. त्या निकषांना ग्रुप ए असं नाव दिलं आहे. ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले 90 टक्के नागरिक, दुसरा डोस घेतलेले किमान 70 टक्के नागरिक, पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून कमी, रूग्णाला लागणारे बेड आणि ऑक्सिजन सपोर्ट बेड यांचं प्रमाण 40 टक्क्यांहून कमी असे चार निकष ज्या जिल्ह्यांना लागू पडतात त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. या निकषांमध्ये बसणाऱ्या जिल्ह्यांना ए ग्रुप मधले जिल्हे असं संबोधण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले चौदा जिल्हे आहेत जिथे सर्व क्षमतेने थिएटर्स, चित्रपटगृहं आणि रेस्तराँ सुरू होणार आहेत.

काय आहे नियमावली?

सर्व सरकारी, खासगी कार्यालयं 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास संमती

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास संमती

रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधकारक

चित्रपटगृहं, मॉल्स या ठिकाणी प्रवेश करतानाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक

मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्कही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची संमती

लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार यावर असलेले विविध निर्बंधही हटवण्यास संमती

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in