त्र्यंबकेश्वर वाद : ‘हे कोत्या वृत्तीची लोक’, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर बरसले
त्र्यंबकेश्वर मंदिर वाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून भाजपवर टीकास्त्र डागलं. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावरून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT

-प्रविण ठाकरे, नाशिक
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्यावरून वाद निर्माण झाला. भाजप आध्यात्मिक आघाडीसह काही हिंदूत्ववादी संघटनांनी मुस्लिमांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तर गावकऱ्यांनी ही पारंपरिक परंपरा असल्याचं सांगितलं. त्र्यंबकेश्वर मंदिर वाद आणि राज्यातील काही शहरात घडलेल्या दंगलीच्या घटनांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पलटवार केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही कार्यक्रम आखून देणार आहेत. दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवण्यावरून उद्भवलेल्या वादावर भूमिका मांडली.
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे उतरणार मैदानात?
राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की वर्षानुवर्षांची परंपरा तिकडे चालू असेल, तर ती थांबवण्या अर्थ नाही. हा विषय तिथल्या संस्थान आणि गावकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा मशिदी आहेत, जिकडे वर्षानुवर्षे तिथे हिंदू मुस्लीम सख्य दिसतं.”