NCP ने भाजपला पकडलं जाळ्यात, आता फडणवीस काय करणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Prasad Lad vs NCP: मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) सातत्याने केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याने भाजपची (BJP) अडचण वाढलेली असताना त्यात आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वक्तव्याने वादाला नवी फोडणी मिळाली आहे. (controversial statements of bjp leaders regarding shivaji maharaj ncp caught bjp in a trap what will fadnavis do now)

प्रसाद लाड म्हणतात, शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला..

‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी असं तुम्ही विचाराल.. तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली.’ असा चुकीचा इतिहास प्रसाद लाड यांनी सांगितला.

ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लागलीच हा मुद्दा पकडला. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत असं म्हटलं की, ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे.’ असा टोला हाणत राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!

ADVERTISEMENT

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही ही संधी अजिबात सोडली नाही. त्यांनीही ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘परत एकदा छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबत छेडछाड. आमदार प्रसाद लाड यांनी तर इतिहासच बदलला.’

‘शिवाजी महाराजांची भवानी तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार’; संजय राऊतांचा चढला पारा

याआधी राज्यपालांनी हिरो तर अनेक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले असं वादग्रस्त विधान केल्याने आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे.

राज्यपालांनी माफी मागण्यापासून ते त्यांना राज्यपालपदावरून हटवण्यासाठी गेले अनेक दिवस आंदोलनं सुरु आहेत. भाजपचे खासदार उदयनराजेंनी तर कोश्यारींविरोधात उघड भूमिका घेऊन आपल्याच सरकारला अडचणीत आणलं आहे.

सध्या हा वाद शमलेला नसतानाच प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने भाजप आणि परिणामी त्यांचे साथीदार शिंदे गटाचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आणखी एक मुद्दा मिळाला आहे. ज्यावरुन ते पुढील काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

अशावेळी आता भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे राज्यपालांबाबत आक्रोश वाढत असताना दुसरीकडे भाजपचे अनेक नेते राजांबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. अशावेळी या सगळ्यातून नेमका कसा मार्ग काढायचा असा प्रश्न खुद्द देवेंद्र फडणवीसांनाही नक्कीच पडला असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT