Shiv sena-Bjp : “अजून वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर यावं”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावर राजकीय वर्तुळात अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भूमिका मांडली आहे. आठवलेंनी या घटनेसाठी ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याचा सल्लाही दिला. रामदास आठवले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावर राजकीय वर्तुळात अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भूमिका मांडली आहे. आठवलेंनी या घटनेसाठी ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याचा सल्लाही दिला.
रामदास आठवले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच जाऊ दिलं नसते. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर यावं. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही,” असा सल्ला त्यांनी दिला.
“राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असून, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. ते पुन्हा आमच्याबरोबर येण्याचा निर्णय बदलत नाही. याबद्दल मला वाईट वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विचार बदलून आमच्या सोबत सत्तेत यावे,” अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामदास आठवले यांना शरद पवारांच्या घराबाहेरील हिंसक आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून, या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे.”










