१९८५ मध्ये शिवसेनेचा विजय मशाल या चिन्हावरच झाला होता..काय घडलं होतं तेव्हा?

मुंबई तक

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला. शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नाव मिळालं आहे. तर मशाल हे पक्षचिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्ह मिळणं बाकी आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला. शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नाव मिळालं आहे. तर मशाल हे पक्षचिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्ह मिळणं बाकी आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाने मशाल चिन्ह मिळताच जल्लोष केला. मात्र या मशालीचा एक इतिहास शिवसेनेत आहे. छगन भुजबळ यांचा विजय या मशाल चिन्हावरच झाला होता.

काय आहे मशाल चिन्हाचा इतिहास?

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेना स्थापन केली. मात्र १९८९ पर्यंत पक्षाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. मात्र त्याआधी १९८५ मध्ये मशाल या चिन्हावर छगन भुजबळ माझगाव मधून निवडून आले होते. निवडणूक लढवत असताना शिवसेनेने १९८९ पर्यंत विविध चिन्हं घेतली होती. त्यातला मशाल या चिन्हावर पहिला मोठा विजय १९८५ ला मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं धगधगती मशाल. तेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला आत्ता मिळालं आहे.

छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर जिंकली होती निवडणूक

छगन भुजबळ यांनी मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यावेळीही पक्षाला निवडणूक लढवायची असेल तर काय चिन्ह वापरायचं? यावर बरीच चर्चा झाली होती. या चर्चेत मनोहर जोशीही होते. उगवता सूर्य आणि बॅट बॉल या इतर दोन चिन्हांचाही विचार तेव्हा झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह तेव्हा दिलं होतं. त्यावर छगन भुजबळ निवडून आले आणि आमदार झाले. मशाल या चिन्हावर मिळालेला तो पहिलाच विजय होता.

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही तेव्हा धगधगती मशाल मिळावी यासाठी आग्रही होतो कारण मशाल हे क्रांतीचं चिन्ह आहे. लोकांना नवी दिशा देण्याचं काम ही मशाल करू शकते असं आम्हाला वाटलं होतं त्यामुळे आम्ही त्यावेळी या चिन्हासाठी आग्रही होतो असं छगन भुजबळ यांनी तेव्हा म्हटलं होतं. त्यावेळी निवडणुकीचा प्रचार हा आत्तासारखा हायटेक झाला नव्हता. त्यावेळी होर्डिंग, फलक, भिंती यावरच चिन्ह रेखाटून प्रचार करावा लागत असे. अशा काळात धगधगती मशाल दाखवणं हे इतर चिन्हांच्या तुलनेत सोपं होतं त्यामुळे शिवसेनेने हे चिन्ह घेतलं आणि निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे त्यावरून १९८५ मधल्या या विजयाची आठवण अनेकांना झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp