अमरावती हिंसाचारामागे भाजपचा हात होता? काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद उमटले. या सगळ्या घटना आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं गृह खातं हे सातत्याने चर्चेत आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे त्यांना सोडावं लागलेलं गृहमंत्रीपद त्यानंतर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होणं या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद उमटले. या सगळ्या घटना आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं गृह खातं हे सातत्याने चर्चेत आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे त्यांना सोडावं लागलेलं गृहमंत्रीपद त्यानंतर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होणं या सगळ्या घडामोडी गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षे पूर्ण होतील. त्याच निमित्ताने इंडिया टुडेचे सीनियर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
महाराष्ट्रात दंगेसदृश परिस्थिती आहे की? परिस्थिती नियंत्रणात आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘अमरावती, नांदेड आणि इतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आता परिस्थिती आटोक्यात आहे. शांतता प्रस्थापित झालेली आहे. आता प्रश्न राहतो तो की अशा घटना का घडल्या. त्यामध्ये तपास सुरू आहे पण एक घटना बांगलादेशात घडली, त्याची प्रतिक्रिया त्रिपुरात उमटली. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काही संघटना 12 नोव्हेंबरला गेल्या होत्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपतर्फे बंद पुकारला गेला होता.’
भाजपने बंद पुकारल्यानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचाराचा प्रकार घडल्याचं राज्याने पाहिलं. मला वाटतं आपण या राज्याचे नागरिक आहोत.तिथे राजकारण आपल्या ठिकाणी पण संयम ठेवलं पाहिजे. राज्य कोरोनाच्या संकटातून आताशा बाहेर पडतं आहे. पोलीस दलावर किती ताण होता हे आपल्याला माहित आहेच. अशा वेळी अशी परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे अधिक भाष्य करता येणार नाही पण ही परिस्थिती दुर्दैवी आहे असं मत दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केली आहे.
अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक
अमरावतीतल्या हिंसाचारावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. कारण भाजपने या प्रकरणी काँग्रेसवर आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकऱणी भाजपवर आरोप केला होता. याबाबतही दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही राजकारण करता आहात. मात्र त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले भाजपने असं समजण्याचं काहीही कारण नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा हा निर्णय आहे. आम्ही आकसातून ही कारवाई केलेली नाही. तपासात जी नावं पुढे येतील त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.