Maharashtra politics : सोमवारपासून (17 जुलै) विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. अजित पवारांसह त्यांच्या गटातील मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांना कॉल करून वाय.बी. सेंटरला बोलावून घेतलं. त्यामुळे राष्ट्रवादीत आता काय होणार, या चर्चेने वेग धरला आहे. (Ajit Pawar and other minister met sharad pawar at yb chavan centre)
पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची बैठक सुरू असतानाच अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्री आणि नेते अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. रविवारी (16 जुलै) दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास हे नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या केंद्रात पोहोचले.
सुप्रिया सुळे यांचा जयंत पाटील यांना कॉल
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड हेही होते. मात्र, जयंत पाटील यांनी बैठक सोडून वाय.बी. चव्हाण सेंटरला गेले.
बैठकीला जाण्यापूर्वी जयंत पाटील असं म्हणाले की, “मला सुप्रिया सुळे यांचा कॉल आला होता. शरद पवार यांच्या भेटीला कोण आलंय, याबद्दल मला काही माहिती नाही. मी इकडे बैठकीला आलो होतो. तिथे गेल्यानंतरच सांगू शकेल.”
वाचा >> Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र
शरद पवार यांच्या भेटीला कोण-कोण?
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये गेले.
वाचा >> Maharashtra CM : फडणवीसांना पहिली पसंती! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना ठरले भारी
रविवारीच झालं होतं राष्ट्रवादीत बंड
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा रविवारी घडामोडी सुरू झाल्या. यापूर्वी अजित पवार यांनी शपथविधीसाठी रविवारचाच दिवस निवडला होता. 2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतरांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दुसऱ्यांदा राष्ट्रवादीत रविवारी गाठीभेटी सुरू झाल्याने, काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.