Video : संतोष बांगरांना मतदारसंघात रोखलं; संतापात गावकऱ्याला श्रीमुखात भडकावली!
हिंगोली : यात्रेसाठी परंपरेचा दाखला देत दर्शनापासून रोखल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी तिथं उभ्या असलेल्या गावकऱ्याच्या थेट कानाखाली ठेऊन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. मात्र बांगर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असं काही घडलचं नसल्याचं म्हणतं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नेमकं काय घडलं? कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा […]
ADVERTISEMENT

हिंगोली : यात्रेसाठी परंपरेचा दाखला देत दर्शनापासून रोखल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी तिथं उभ्या असलेल्या गावकऱ्याच्या थेट कानाखाली ठेऊन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. मात्र बांगर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असं काही घडलचं नसल्याचं म्हणतं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमकं काय घडलं?
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या जत्रेत राजकीय पुढाऱ्यांना बोलवल जात नाही. मात्र आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर दर्शनासाठी आले. यावेळी गावकऱ्यांनी परंपरेचा दाखला देतं त्यांना रोखलं. आपण जत्रा संपल्या नंतर दर्शनाला यावं, अशी विनंती गावकऱ्यांनी केली.
त्यानंतर गावातील आमदार बांगर समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांच्या समोर आले आणि दोन गटांमध्ये तू – तू, मै – मै झाली. याच वादात बांगर यांनी एका गावकऱ्याच्या कानाखाली लगावली. वाद वाढल्याचं पाहुन काही स्थानिकांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेतलं.
दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना (UBT) पक्षाचे संपर्क प्रमुख बबन थोरात म्हणाले, आम्ही घेतलेली भूमिका योग्यच होती. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायला लागलं तर जनतेचा उद्रेक होतोच, गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती योग्यच होती. ज्यांना गावच्या भावना समजत नाहीत तो राजकारणामध्ये कच्चा आहे, असा टोलाही बबन थोरात यांनी आमदार संतोष बांगर यांना लगावला.
मागील काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रदर्शित होताच बांगर यांना अनेकांनी ट्रोल करत जाब विचारला होता. त्यानंतर बांगर यांनी मध्यान्ह भोजन घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवून जेवणाची पाहणी केली. यावेळी डब्यात करपलेल्या पोळ्या, वारणात अळ्या आढळ्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ पीक विमा कंपनी कार्यालयात आयोजित बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे पाहुन बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट कार्यालात घुसून साहित्याची मोडतोड केली होती.