
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच राज्यात भाजपचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल मौन बाळगलेल्या एकनाथ शिंदेंनी नवं सरकार आणि मंत्रिपदाबद्दल भाष्य केलंय.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार बुधवारी रात्रीच कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वही सोडलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलीये. शिंदे गट आणि भाजपत आधीच मंत्रिपदाचं वाटप झाल्याचंही समोर येतंय, पण यावर शिंदेंनी खुलासा करत वृत्त फेटाळलं आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी सकाळी १० वाजता दोन ट्विट केले आहेत. या दोन ट्विटमध्ये शिंदे यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपसोबत सरकार स्थापन करत असल्याचंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं आहे.
शिंदे यांनी पहिल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?
"वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे हाच आमचा फोकस," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
दुसऱ्या ट्विटमध्ये काय?
"भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका," असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करत असल्याचं अधोरेखित केलं आहे. भाजपसोबत कोणतीह आणि किती मंत्रिपदे याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल असं शिंदे म्हणाले आहेत. म्हणजेच सरकार स्थापन करण्याबद्दल एकमत झालं असून, खातेवाटपाची चर्चा लवकरच केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
आज राज्यपालांची घेणार भेट
राज्यातील सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट सरकार स्थापनेच्या तयारीला लागला आहे. बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदार गुवाहाटीवरून गोव्यात आले. त्यानंतर आज एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
एकनाथ शिंदे हे सकाळी गोव्यावरून मुंबईसाठी रवाना झाले असून, मुंबईत पोहोचल्यानंतर ते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीच्या सत्ता स्थापनेबद्दल निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.