
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नसतं असं म्हटलं आहे. तसंच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असंही म्हटलं आहे. त्यानंतर आता यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis)
"राज ठाकरेंनी मविआ सरकारकडून याहून वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. एवढी भाबडी अपेक्षा कशी काय ठेवली? जे सरकार लांगुलचालन करतंय, हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोह लावून जेलमध्ये टाकतं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही लढावं" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी भाषण केलं. या भाषणात त्यांनी मशिदींवरच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर १२ एप्रिलला त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. या उत्तर सभेत त्यांनी सरकारला मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला. १ मे रोजी त्यांनी औरंगाबादला सभा घेतली या सभेतही या अल्टिमेटमचा त्यांनी पुनरूच्चार केला. त्यानंतर एक दिवसाने त्यांनी ३ मे रोजी रमजान ईद असल्याने ४ मेपासून भोंगे उतरले पाहिजेत अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील आणि भारतातील हिंदू बांधवांना उद्देशून पत्रही लिहिलं.
४ मे पासून भोंगे उतरवण्यासाठी अनेकजण पुढे येऊ लागले. या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रातून तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं. हीच तक्रार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट इशारा दिला आहे.
२ एप्रिल ते १ मे या कालावधीत ज्या तीन सभा राज ठाकरेंनी घेतल्या त्या तीन सभांमध्ये त्यांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं. शरद पवारांनी जातीयवाद वाढवला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद राज्यात वाढला असे सगळे आरोप केले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ते काहीही म्हणाले नव्हते. आजच्या पत्रात मात्र त्यांनी थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या पत्राला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.