दीपक केसरकर ते शंभूराज देसाई… बंडखोरीत दिली साथ, एकनाथ शिंदेंनी अशी केली परतफेड!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप-शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपही झालं. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर विशेष लक्ष दिलं जात असल्याचं दिसतंय. बंडखोरीत सुरूवातीपासून साथ देणाऱ्या आमदारांची मर्जी शिंदेंकडून पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करताना राखली गेल्याचंच दिसतंय. यात दीपक केसरकरांपासून ते शंभूराज देसाईपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिंदेंच्या बंडखोरीला शिवसेनेतल्या अनेक आमदारांनी साथ दिली. यात दीपक केसरकरांपासून ते उदय सामंत यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपसोबत घरोबा केला आणि सरकार स्थापन केलं. त्यानंतर बंडात साथ देणाऱ्या या आमदारांची मर्जी शिंदेंकडून राखली जात असल्याचंच दिसतंय.

दीपक केसरकर मुंबई शहराचे पालकमंत्री

शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे गटाची भूमिका मांडण्याचं काम केलं ते दीपक केसरकर यांनी. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते झाले. शिंदे गटात मंत्रिमंडळात तीव्र स्पर्धा असताना दीपक केसरकरांना छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली गेली. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना दीपक केसरकर यांना थेट मुंबई शहराच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीये. इतकंच नाही, तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे कोल्हापुरातील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते, तिथलं पालकमंत्री पदही केसरकरांकडे सोपवलं गेलंय. केसरकरांकडे पालकमंत्री पद देऊन शिंदेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शंभूराजे देसाईंवर साताऱ्याबरोबर ठाण्याची जबाबदारी

माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईही शिंदेंच्या बंडात सामील झाले. शंभूराज देसाईंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, पण खातं मात्र मनासारखं मिळालं नाही, असं बोललं गेलं. खाते वाटपामुळे शंभूराज देसाईंची नाराजी शिंदेंनी पालकमंत्री पद देऊन दूर केलीये. शंभूराज देसाई सुरुवातीपासूनच सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. शिंदेंनी सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच ठाण्याचं पालकमंत्रीपदही देसाईंकडे देऊन विश्वास टाकलाय.

जळगावचं पालकमंत्री पद मिळवण्यात गुलाबराव पाटील यशस्वी

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या रस्सीखेच सुरू होती. मात्र, जळगावच पालकमंत्री पद मिळवण्यात गुलाबराव पाटील यशस्वी ठरलेत. बंडानंतर गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांवर थेट हल्लाच चढवला होता. आता गुलाबराव पाटलांकडे जळगावबरोबरच शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही देण्यात आलंय.

ADVERTISEMENT

दादा भुसेंची नाराजी शिंदेंकडून दूर?

मंत्रिमंडळ विस्तार झाला. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना शिंदेंनी मंत्रिमंडळात घेतलं. मात्र, त्यांच्याकडे कमी महत्त्वाचं खात दिलं. मात्र, शिंदेंनी दादा भुसेंची नाराजी नाशिकचं पालकमंत्री पद देऊन दूर केल्याचं बोललं जातंय.

ADVERTISEMENT

District Guardian Minister : अखेर पालकमंत्री जाहीर; फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी

संजय राठोडांना मनासारखा जिल्हा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राजीनामा देऊन पायउतार व्हाव्या लागलेल्या संजय राठोडांनाही त्यांना हवा असलेला जिल्हा देण्यात आलाय. संजय राठोडांकडे वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

औरंगाबाद : अब्दुल सत्तारांवर भुमरे ठरले वरचढ

शिंदेंच्या मंत्रिमंडळात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत. यात संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे शिंदे गटाचे, तर अतुल सावे हे भाजपचे. त्यामुळे औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे जाणार याची उत्सुकता होती. अखेर औरंगाबादचं पालकमंत्री शिंदे गटाकडे गेलंय. मात्र, औरंगाबादच्या पालकमंत्री पदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. भुमरे यांच्या तुलनेत अब्दुल सत्तारांना चांगलं खातं मिळालेलं आहे. त्यामुळे शिंदेंनी भुमरेंना पालकमंत्री पद देऊन नाराजी दूर केल्याचं म्हटलं जातंय.

उदय सामंतांकडे रत्नागिरी बरोबर रायगडचीही जबाबदारी

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शेवटी शिंदे गटात सामील झालेल्या उदय सामंत यांना मंत्रिपदापाठोपाठ कोकणातील दोन जिल्ह्यांची मंत्रिपदं सोपण्यात आलीये. उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीबरोबरच रायगड जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आलीये. त्यामुळे शिंदेंकडून कोकणातील शिवसेनेला आणखी हादरे दिले जाऊ शकतात.

तानाजी सावंत उस्मानाबादचे पालकमंत्री

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेही सुरुवातीपासून महाविकास आघाडीबरोबर जाण्याच्या विरोधात होते. बंडखोरी झाल्यानंतर तानाजी सावंतही शिंदेसोबत गेले. तानाजी सावंत उस्मानाबादच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यांना ते मिळालं आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचीही जबाबदारी सावंतांकडे देण्यात आलीये.

अब्दुल सत्तारांना हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद

इतर मंत्र्यांच्या तुलनेत अब्दुल सत्तार यांच्याकडे छोट्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलीये. मंत्रिमंडळ विस्तारावेळीच वादात सापडलेल्या अब्दुल सत्तारांना मंत्री करून शिंदेंनी कृषी खातं दिलं. पालकमंत्री पदांच्या नियुक्त्यामध्ये मात्र, अब्दुल सत्तारांना झुकतं माप दिलं गेलं नाही. सत्तारांना हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT