'आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...' दिपकेंनी काय सांगितलं? आंदोलनाची पुढील दिशा काय?
सीजेपीच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याविषयी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...
दिपकेंनी काय सांगितलं?
आंदोलनाची पुढील दिशा काय?
Abhijeet Dipke : दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याविषयी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही कोणतीही पदयात्रा काढणार नाही, मात्र जंतर-मंतरवर आंदोलन सुरुच राहणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. यापुढं आंदोलनाची दिशा काय असेल याविषयी ते काय म्हणाले, जाणून घेऊया.
नड्डांच्या घरी काय घडलं?
सरकारने वेळकाढूपणा केला असं सांगताना दिपके म्हणाले की, 'आमच्यासोबत सरकारने फक्त वेळ घालवण्याचे काम केले आहे. सरकारने आमच्या मागण्यांवर संवाद साधण्यासाठी आमचे प्रतिनिधी मंडळ बोलावून घेतले. पण तिथं त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जे.पी.नड्डा यांच्या घरी एकप्रकारे कैद करण्यात आले होते. त्यांना तिथून बाहेर पडू दिलं नाही. आमच्या टीमला एकत्र येऊ न देण्याचा आणि मला एकट्याला पाडण्याचा त्यांचा डाव होता. आम्हाला एकत्र येता येऊ नये यासाठी सौरभ आणि आशुतोष यांना पाच तास नड्डांच्या घरी थांबवण्यात आलं. एका बाजूला संवाद साधण्यासाठी बोलवता आणि दुसऱ्या बाजूला मुलांना मारहाण करता? पोलिसांनी नेम टॅग काढून मारहाण केली. यापुढे आता सरकारला संवाद साधायचा असेल तर जंतर-मंतरवर यावं लागेल. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही.'
हे ही वाचा : तंबू उखडून फेकला, जंतर-मंतरवर रात्री भेदरलेल्या 'त्या' तरुणी
आंदोलनाची पुढील दिशा काय?
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाविषयी बोलताना दिपकेंनी सांगितलं की, 'काल मुलांवर झालेला लाठीचार्ज आणि हिंसाचारामुळे त्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमचं धरणे आंदोलन पुढं सुरु राहणार असल्याचंही दिपके म्हणाले. पदयात्रेविषयी बोलताना ते म्हणाले की', आम्ही आता पदयात्रा काढणार नाही. कारण या सरकारला आणि पोलिसांना विद्यार्थ्यांचं रक्त हवंय. त्यांना विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा नाही. पण आम्हाला काळजी आहे. कोणताही विद्यार्थी जखमी होऊ नये असं आम्हाला वाटतं. काल जे घडलं ते दुर्दैवी होतं. कालचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस होता. ही लोकशाही नाही.'
हे ही वाचा : जंतर-मंतरवर आंदोलक पुन्हा जमायला सुरुवात, जोरदार घोषणाबाजी सुरु
आम्ही मागे हटणार नाही
काल झालेल्या हिंसाचारात 150 पेक्षा जास्त मुलं जखमी असल्याचं दिपकेंनी सांगितलं. ते म्हणाले की, 'मी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन काही मुलांना भेटून आलो. एक मुलगी क्रिटिकल आहे. तिच्या गळ्यावर दिल्ली पोलिसांनी काठी मारली. तिला जर काही झालं तर दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांची जबाबदारी असेल. आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागं घेणार नाही. कालच्या प्रकारानंतर आम्ही अजिबात मागे सरकणार नाही.'










