Sanjay Raut : "अशोक चव्हाण एकनाथ शिंदेंसोबतच सोडणार होते काँग्रेस", मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut Ashok Chavan : खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
Sanjay Raut Ashok Chavan : काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले होते, तेव्हाच काँग्रेस पक्ष सोडण्याची चव्हाणांची योजना होती, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut Said Ashok Chavan had a plan to quit congress two year before)
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद झाली. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले, "कालपासून आम्ही पाहतोय. योगायोगाने उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यविधाते म्हणवून घेणारे शंकरराव चव्हाणांचे सुपूत्र अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला. आणि आज (१३ फेब्रुवारी) दुपारी बारा वाजता स्वतःचे बारा वाजवून घेताहेत. काय भाजपवासी होताहेत."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राऊत पुढे म्हणाले की, "खरं म्हणजे अशोक चव्हाण स्वतःची किती अवहेलना करू घेत आहेत. या राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यांनी एक-दोन वेळा भूषवलं, अनेक वर्ष मंत्री राहिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री. काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब."
मोदींवर टीका... भाजपला केलं लक्ष्य
"आता आमच्यापुढे एक पेच आहे की, पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील? किंवा मोदी यांच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखी एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का? नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहिदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला. हे स्वतः मोदी सांगतात. भाजपने शहिदांच्या अपमानाविरुद्ध आंदोलन सुरू केलं. आज त्या शहिदांच्या अपमानाचं काय झालं?", असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
दोन वर्षांपूर्वी सोडणार होते काँग्रेस
यावेळी राऊत म्हणाले की, "अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांची काँग्रेस सोडण्याची योजना होती. अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपडताहेत. त्यांना आता मुहूर्त मिळाला असेल."
ADVERTISEMENT
"त्यांनी घेतलेला हा निर्णय, हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून, त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे. काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं की, हा चुकीचा निर्णय आहे", अशी माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ADVERTISEMENT