Sambhaji Bhide: ‘फडणवीसांच्या गुरुजींचे आगी लावण्याचे कारस्थान..’, ‘सामना’तून जहरी टीका

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis and Sambhaji Bhide have been heavily criticized in the Saamana editorial. It has also been alleged that BJP is creating riots for elections in various states.
Devendra Fadnavis and Sambhaji Bhide have been heavily criticized in the Saamana editorial. It has also been alleged that BJP is creating riots for elections in various states.
social share
google news

मुंबई: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या विधिमंडळात देखील गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यांच्या अटकेची मागणी देखील झाली. मात्र, याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांना गुरुजी म्हटलं होतं. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलेला. असं असताना आता याच मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस, संभाजी भिडे आणि भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे.’ अशा शब्दात अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.

पाहा ‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • मणिपुरात हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उपवस्त्रांनी आता हरयाणातही हिंसा भडकवून अनेकांचे बळी घेतले, मालमत्तेचे नुकसान केले. दहशतीचे वातावरण निर्माण केले. हरयाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी तयारी झाल्याची माहिती आहे. हरयाणा व राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होतील. त्याची ही पूर्वतयारी दिसते. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे. हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय विद्वेष भडकवून आगी लावण्याच्या कारस्थानाचे हे पहिले पाऊल आहे.
  • ज्या औरंग्यास महाराष्ट्राने गाडले त्याच्या कबरीवरची माती उकरण्याचा प्रयत्नदेखील सुरू झाला आहे. देश घडविण्याची अक्कल नसली की, देश जाळून राज्य करायचे हा या मंडळींचा कावा आहे. संपूर्ण देशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसांची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे. महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यांवर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे. हरयाणात दंगल भडकविण्याचे कारण नव्हते.
  • विश्व हिंदू परिषदेचे नाव या दंगलीत आले आहे. विश्व हिंदूवाल्यांनी काढलेल्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेस म्हणे नूंह खंडलाजवळ एका समुदायाच्या तरुणांनी अडविण्याचा प्रयत्न केला, तेथे संघर्षाची ठिणगी उडाली व दंगलीस सुरुवात झाली. या दंगलीने हिंदू-मुसलमान असे स्वरूप प्राप्त केले. भारतीय जनता पक्षाला जे हवे तसेच सर्व घडवून हरयाणात मतांच्या जातीय तसेच धार्मिक ध्रुवीकरणास सुरुवात झाली आहे.
  • इतक्या मोठय़ा संख्येने निघालेल्या हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेस रस्त्यावर कोणी अडविण्याचा प्रयत्न करील व त्यांच्यावर दगडफेक करील हे संभव नाही. कारण हरयाणात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्यामुळे हे शक्य नाही, पण दंगली भडकवायच्याच हे आधी ठरले होते. या हिंसेमुळे नंतर ठिकठिकाणी हल्ले सुरू झाले. दिल्लीजवळचे गुरगावही पेटले. बजरंग दलाच्या एका नेत्याने आव्हानाची भाषा करून नूंह येथे घुसण्याचा प्रयत्न केला व त्यास थांबविण्याची कारवाई सरकारने केली नाही. म्हणजे हरयाणा सरकारला हा तणाव हवाच आहे. आता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने मोर्चा काढून भडकवा भडकवी चालूच ठेवण्याचे ठरवले, तेव्हा शेवटी सर्वोच्च न्यायालयास मध्ये पडून हस्तक्षेप करावा लागला.

हे ही वाचा >> Vidhansabha: ’50 खोकेंचा’ प्रश्न विचारला मुख्यमंत्री शिंदेंना, पण उत्तर दिलं अजित पवारांनी!

  • न्यायालयाने साफ खडसावले आहे की, मोर्चामध्ये द्वेषपूर्ण भाषणे झाल्यास, हिंसाचार झाल्यास कडक कारवाई करा. कोणत्याही समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण होणार नाही याची खबरदारी घ्या, पण भाजपपुरस्कृत माथेफिरूंच्या टोळय़ा सर्वोच्च न्यायालयास तरी जुमानतील काय? जेथे निवडणुका तेथे दंगल, जेथे पराभव दिसतोय तेथे हिंसाचार हे भारतीय जनता पक्षाचे राजकीय सूत्र व जाहीरनामा दिसतोय. हा जाहीरनामा उघड झाला आहे.
  • ‘हेट स्पीच’ म्हणजे द्वेषपूर्ण भाषण हे त्यांचे हत्यार बनले आहे व त्यासाठी त्यांनी अनेक माथेफिरू पाळले आहेत. हरयाणा, मणिपूरच नव्हे तर संपूर्ण देशातील कायदा-सुव्यवस्था अशा पद्धतीने खिळखिळी करून सोडली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल. हे लोक हिंदू-पाकिस्तान दंगली घडवतील, मंदिरांवर हल्ले घडवून आणतील, जवानांच्या हत्या करतील, पाकिस्तानबरोबर लुटुपुटुचे युद्ध करतील. ते काहीही करतील. जे पुलवामा करू शकतात ते काहीही करतील, असा इशारा जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी दिला आहे व जसजशा निवडणुका येत आहेत तसे हे सर्व तंतोतंत घडताना दिसत आहे. देशाची सूत्रे अशा लोकांच्या हाती गेली आहेत, ज्यांच्या लेखी जनतेच्या जिवाचे मोल शून्य आहे.
  • दंगली, कत्तली, विरोधकांना अडकवणे हाच त्यांचा राजकीय खेळ बनला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आता सांगत आहेत, हरयाणाची स्थिती ‘मिनी पाकिस्तान’प्रमाणे झाली आहे. भाजप केंद्रात 9 वर्षे व हरयाणात 10 वर्षे सत्तेत आहे. मग त्यांनी हरयाणाचे ‘मिनी पाकिस्तान’ कसे काय होऊ दिले? हा प्रश्नच आहे. सर्वोच्च न्यायालयास मणिपूर आणि हरयाणाच्या दंगलीत हस्तक्षेप करावा लागला, पण फडणवीसांचे गुरुजी महाराष्ट्रात दंगलीच्या कोठारावर विडय़ा शिलगावत बसले आहेत. या कोठाराचा स्फोट होऊन महाराष्ट्रासारखे राज्य खाक होईपर्यंत वाट पाहायची काय? सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत.

हे ही वाचा >> Nitin desai आत्महत्या प्रकरणी ‘या’ 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. गुरुजी म्हणजे हिंदुत्व नाही, गुरुजी म्हणजे महाराष्ट्र नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे, पण महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT