दादांच्या मृत्यूनंतर सूनेत्राताई अॅक्टिव्ह मोडवर, सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात, अन् कॅबिनेटमधील 3 मोठ्या निर्णयांची चर्चा
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच सूनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या निर्णयावर काही विरोधकांकडून टीकाही झाली. मात्र कौटुंबिक आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बारामती दौऱ्यावर आलेल्या सूनेत्राताईंनी प्रथम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर ‘दादा स्टाइल’ जनता दरबार घेऊन नागरिकांची निवेदने स्विकारली. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या दरबारात विविध प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दादांच्या मृत्यूनंतर सूनेत्राताई अॅक्टिव्ह मोडवर
सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात
अन् कॅबिनेटमधील 3 मोठ्या निर्णयांची चर्चा
Sunetra Pawar, बारामती : महाराष्ट्राचे 'दादा' म्हणजेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातात मृत्यू होऊन आता 17 दिवस उलटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अर्थमंत्री, सहकार क्षेत्रातला तगडा चेहरा राज्याने गमावल्यानंतर याची कसर कोण भरुन काढणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, दादांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अॅक्टिव्ह मोडमध्ये येत कामाची सूत्रे हाती घेतली आहेत. दादांच्या कार्यशैलीची आठवण करून देणाऱ्या पद्धतीने त्यांनी बारामतीत जनता दरबार भरवत सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यास सुरुवात केली.
सूनेत्रा पवारांकडून सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात
अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच सूनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या निर्णयावर काही विरोधकांकडून टीकाही झाली. मात्र कौटुंबिक आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बारामती दौऱ्यावर आलेल्या सूनेत्राताईंनी प्रथम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर ‘दादा स्टाइल’ जनता दरबार घेऊन नागरिकांची निवेदने स्विकारली. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या दरबारात विविध प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बारामती - इंदापूरसाठी कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय
दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय चर्चेत आले आहेत. बारामतीजवळील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीसाठी कृषी महामंडळाची एक हजार एकरांहून अधिक जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय, बारामती तालुक्यातील कटफळ गावात जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी 75 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बारामती दौऱ्यात सूनेत्रा पवार माळेगाव साखर कारखाना, बारामती दूध संघ आणि बारामती खरेदी-विक्री संघाच्या संचालकांसोबतही बैठक घेणार आहेत. विविध सहकारी संस्थांशी संवाद साधून प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात सूनेत्राताई यांनी घेतलेली वेगवान कामकाजाची भूमिका आणि कॅबिनेटमधील निर्णयांमुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा रंगू लागली आहे.










