Uddhav Thackeray : ठाकरेंचं दिल्लीत विधान; म्हणाले, “मोदींसमोर चेहरा…”
Uddhav Thackeray News : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीआधी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आघाडीला जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांच्याप्रमाणे नेतृत्व करणारा चेहरा हवा आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray INDIA Alliance Meet : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सहभागी होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीच्या चेहऱ्याबद्दल मोठं विधान केले.
उद्धव ठाकरे दिल्लीत बोलताना म्हणाले, “तीन-चार राज्यात निवडणुका होत्या. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्या राज्यातील इंडिया आघाडीतील सामील असलेले आणि नसलेले पक्ष होते. पण एवढ्या कालावधीनंतर ‘इंडिया’ची बैठक होत आहे. साहजिकच आहे की, निवडणूक निकालांवर चर्चा होईल. डिसेंबर संपला. पुढील वर्षी निवडणुका वेळापत्रकानुसार होतील, त्याच्या तयारीला सगळ्यांनी लागण्याची गरज आहे. बाकीच्यांच्या सूचना काय असेल, त्यानंतर आमच्या सूचना मांडू”, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
इंडिया आघाडीचा चेहरा ठरवावा लागेल -ठाकरे
“इंडिया आघाडीला चेहरा असणं गरजेचं आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शेवटी मोदीजींसमोर चेहरा हा एक विषय असला, तरी देखील या आघाडीला समन्वयक, निमंत्रक त्याचबरोबर एक चेहरा आज नाही तर उद्या ठरवावा लागेल. जसं शरद यादव होते. जॉर्ज फर्नांडिस होते”, अशी भूमिका ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल मांडली.
हेही वाचा >> आठ पानी सुसाईड नोट, चार नेत्यांची नावे; गळफास लावून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
“आमच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं. हे बघितल्यानंतर देशातील लोकशाही शेवटची घटका मोजतेय का? हा प्रश्न आहे तिला जिवंत ठेवायचं असेल, तर सगळ्यांनी देश सर्वोच्च ठेवायला हवा. त्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलोय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.