उद्धव ठाकरे अचानक रात्रीच पोहचले जंतर-मंतरवर, दिपकेच्या पाठीवर थाप अन् घणाघाती भाषण! जसंच्या तसं..
Uddhav Thackeray Speech: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दिला. पाहा त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन CJP (Collective Justice Platform) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकशाहीची लढाई संबोधत, सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, असे म्हटले.
'विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहीत नाही'
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले,
"ज्यांनी तुम्हाला 'कॉकरोच' म्हटलं... त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा देश कोणत्याही एका पक्षाने बनवलेला नाही. स्वातंत्र्यासाठी तुमच्यासारख्याच वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, म्हणून आपण आज स्वतंत्र भारतात उभे आहोत."
त्यांनी पुढे ब्रिटिश राजवटीचा संदर्भ देत म्हटले की, त्या काळात क्रांतिकारकांनाही 'दहशतवादी' म्हटलं जात होतं. आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्याच प्रकारची भाषा वापरली जात असल्याची टीका त्यांनी केली.










