सुषमा अंधारेंची विधानपरिषदेसाठी रश्मी ठाकरेंकडे फिल्डिंग? मातोश्रीवर इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला मिळणार संधी?
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना (UBT) मध्ये जोरदार चढाओढ सुरू असून सुषमा अंधारे, वैभव नाईक आणि सुरज चव्हाण यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या नावाची अट घातली असतानाही इच्छुकांनी मातोश्रीवर फिल्डिंग लावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुषमा अंधारेंची विधानपरिषदेसाठी रश्मी ठाकरेंकडे फिल्डिंग?
मातोश्रीवर इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला मिळणार संधी?
Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावरच सहमती देण्याची अट घातली असतानाही, पक्षातील इतर दिग्गज इच्छुक नेते मात्र कमालीचे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वतःच्या उमेदवारीबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, नेमकी याच संधीचा फायदा घेत शिवसेनेच्या गोटातून अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. मातोश्रीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी विविध माध्यमांतून वशिला लावण्यास आणि मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, कोणाला संधी मिळणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुषमा अंधारे आणि सुरज चव्हाणांच्या नावाची जोरदार चर्चा
या जागेसाठी पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी गळ घातल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे, पक्षाचे सचिव आणि युवा सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्या नावासाठी स्वतः आदित्य ठाकरे शिफारस करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केवळ हेच नेते नव्हे, तर कोकणातील आक्रमक नेते वैभव नाईक आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार संजय राऊत यांच्यामार्फत आपली बाजू लावून धरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक इच्छुक नेता आपल्या परीने मातोश्रीवर वशिला लावण्यासाठी कसरत करत असून, यामुळे पक्षप्रमुखांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी जवळच्या सहकाऱ्यांचा आग्रह
एकीकडे अनेक नेते या जागेवर डोळा ठेवून असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. या दोन्ही नेत्यांचा असा ठाम आग्रह आहे की, विधानपरिषदेच्या या एकमेव जागेवर स्वतः उद्धव ठाकरे यांनीच जावे. काँग्रेसनेही ठाकरेंच्या नावाचाच आग्रह धरल्याने, इतर कोणत्याही नावाचा विचार न करता स्वतः पक्षप्रमुखांनीच निवडणूक लढवावी, यासाठी देसाई आणि नार्वेकर सतत पाठपुरावा करत आहेत.









