Mumbai News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं काम वेगानं सुरू असून यामध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंक (सी ब्रिज) च्या बांधकामाचा देखील समावेश आहे. या प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचं 26 टक्के पूर्ण झालं असून मार्च 2028 पर्यंत ते प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
कसा असेल मार्ग?
हा संपूर्ण मार्ग 'स्वातंत्र्यवीर सावरकर बांद्रा-वर्सोवा सी ब्रिज'च्या नावाने ओळखला जाणार आहे. या सी-लिंकचं काम वेगानं सुरू आहे. मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग असलेला वर्सोवा-वांद्रे सी लिंक शहराच्या किनारपट्टीपासून सर्वात दूरच्या ठिकाणी पोहोचला आहे. वांद्रे आणि जुहू दरम्यान अरबी समुद्रात 900 मीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. चार इंटरचेंज/कनेक्टर पुलांचे कामही सुरू आहे. हे पूल वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा आणि वर्सोवा येथे बांधले जातील आणि या ठिकाणी खांब बसवण्याचं काम देखील सुरू झालं आहे.
हे ही वाचा: पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद... आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल!
प्रोजेक्टचं काम कधीपर्यंत होणार पूर्ण?
25 किलोमीटर लांबीचा वर्सोवा-वांद्रे सी लिंक (VBSL) हा कोस्टल रोडच्या नरिमन पॉइंट-वरळी सेक्शन, दक्षिणेला वांद्रे-वरळी सी लिंक आणि उत्तरेला वर्सोवा-कांदिवली-भाईंदर कोस्टल रोड दरम्यान एक अत्यंत आवश्यक असलेला इंटरसेक्शन असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितलं की, प्रकल्पाचं 26 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे आणि मार्च 2028 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून हा सी ब्रिज बनवला जात असून त्याचं आयुष्यमान जवळपास 100 वर्षे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रोजेक्टसाठी अंदाजे 1,500 झाडे तोडली जाणार असल्यामुळे पर्यावरणीय चिंता व्यक्त केल्या जात आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकावर मोठं अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे ट्रेनच्या फेऱ्या वाढणार...
हा पूर्ण कोस्टल रोड 60 किमी लांब असून तो मुंबईतील बऱ्याच महत्त्वपूर्ण मार्गांना जोडला जाणार आहे. सध्या, वर्सोवा ते भाईंदरला जाण्यासाठी जवळपास 90 ते 120 मिनिटे लागतात. परंतु, या सी ब्रिजचं काम पूर्ण झाल्यानंतर हे प्रवास केवळ 15 ते 20 मिनिटांत शक्य होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
ADVERTISEMENT











