Mumbai News: नुकतंच, राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य उत्सावाचा दर्जा देण्यात आला आहे. या काळात गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप उभारणं, हे तितकंच महत्त्वाचं काम असतं. मात्र, या कामासाठी यंदा सार्वजनिक मंडळांना आर्थिक फटका बसणार असल्याची बाब समोर आली आहे. गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे खणल्यास एका खड्ड्यामागे 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याची महापालिकेने घोषणा केली आहे. महापालिकेचा हा निर्णय गणेश मंडळांसाठी अन्यायकारक असून मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी हा दंड रद्द करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
गणेशोत्सव मंडळांना दंडाचा मोठा फटका
गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक खड्ड्यासाठी 2000 रुपये दंड आकारला जात होता. परंतु काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने एक परिपत्रक जारी करून दंडाची रक्कम 15000 रुपये केली. दंडाच्या रकमेत अचानक सात पट वाढ केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक मंडळांनी हे शुल्क खूप जास्त आणि अन्याय्य असल्याचं मत व्यक्त केलं. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांना परवानग्या, अटी आणि आर्थिक बोजामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता वाढीव दंडामुळे मंडळांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, मोठ्या व प्रसिद्ध मंडळांचे मंडप मोठे असतात. त्यामुळे त्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
हे ही वाचा: "जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतलं..." पत्नीच्या प्रियकराने कॉलवर दिली धमकी! संतापलेल्या पतीने काय केलं?
खड्ड्यांसाठीचा दंड रद्द करण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शनिवारी दादर येथे एक बैठक घेतली. या बैठकीत, मंडप उभारण्याकरिता खड्ड्यांसाठीचा दंड रद्द करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती महानगरपालिका आणि राज्य सरकारशी संपर्क साधणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेचं मत
महापालिकेच्या मते, मंडप उभारताना खड्डा खणल्याचं आढळल्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड याकरिता प्रति खड्डा प्रमाणे रक्कम वसूल करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, रस्ते व पदपथावर खड्डा विरहित मंडप उभारणीकरिता प्रभावी तंत्र उपलब्ध असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या तंत्राचा वापर करुन मंडप उभारण्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: ब्लड टेस्टमध्ये HIV पॉझिटिव्ह... बहीण आणि मेहुण्याने मिळून तरुणाला संपवलं! नेमकं प्रकरण काय?
सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवानंतर खड्डे भरण्याची जबाबदारी घेतात, परंतु तरीही पालिक त्यांच्यावर कारवाई करते. मग, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित कंत्राटदारावर महापालिका कठोर कारवाई करते का? असा प्रश्न समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
