ketan agarwal murder case : पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएश केलाय. रविवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ल्यावर नेले. 18 जून रोजी केतन अग्रवाल यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी सीन रिक्रिएशन करून त्या दिवशी नेमके काय घडले, कोण कुठे उभे होते आणि केतन अग्रवाल दरीत कसे पडले, याचा कथित घटनाक्रम आरोपीकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दुकानदाराचा परफेक्ट प्लॅन, चार महिन्यात आठ जणांना संपवलं, नववी हत्या करतानाच...
पोलिसांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आरोपींनी चौकशीदरम्यान दिलेल्या कथित जबाबांची घटनास्थळावरील परिस्थितीशी पडताळणी करणे हा आहे. आरोपींनी सांगितलेला घटनाक्रम प्रत्यक्ष घटनास्थळाशी जुळतो का, त्यांनी उल्लेख केलेल्या ठिकाणाहून एखाद्याला ढकलणे शक्य होते का आणि सर्व घटना त्यांनी सांगितलेल्या क्रमाने घडू शकल्या असत्या का, याची तपास यंत्रणा खातरजमा करत आहे. याचबरोबर मोबाईल फोन लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनेपूर्वी आणि नंतरच्या हालचालींचीही तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हत्येचा कथित कट नेमका कधी आणि कसा रचला गेला तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट
सिया आणि चेतनने रचला केतनला मार्गातून दूर करण्याचा कट
आतापर्यंतच्या तपासानुसार, 20 वर्षीय सिया गोयल हिचा पुण्यातील 26 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्याशी साखरपुडा झाला होता. मात्र, पोलिसांचा दावा आहे की सियाला ही लग्न करण्याची इच्छा नव्हती. शिवाय तिचे 22 वर्षीय चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते. चौकशीदरम्यान सियाने कथितरित्या पोलिसांना सांगितले की, ठरलेल्या विवाहाला नकार दिल्यास कुटुंबाची आणि समाजात बदनामी होईल, अशी भीती तिला होती. त्यामुळे तिने आणि चेतनने केतनला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.
केतनच्या मृत्यूनंतर लग्नाचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी तिला किमान तीन वर्षांचा अवधी मिळेल, असा तिचा समज होता. तसेच चेतननेही लग्नासाठी काही वर्षांचा कालावधी मागितल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय, फेब्रुवारीतील साखरपुड्यापूर्वी जानेवारी महिन्यात सिया चेतन आणि काही मित्रांसह पाच दिवसांच्या उदयपूर सहलीवर गेल्याची माहितीही तपासात समोर आली असून, पोलिस या सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.
या प्रकरणात 18 जून रोजी केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात हा प्रकार कथित कट रचून करण्यात आलेल्या हत्येचा असल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवाल आपल्या होणाऱ्या बायकोसोबत म्हणजेच सिया गोयलसोबत किल्ल्यावर गेले असताना चेतन चौधरी आधीपासून तेथे उपस्थित होता. पूर्वनियोजित कटानुसार सियाने इशारा दिल्यानंतर चेतनने मागून केतन यांना खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. चौकशीत मिळालेली माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून, सीन रिक्रिएशनसह तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासाद्वारे संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











