उल्हासनगर : एकाच दिवसात 8 जणांना सर्पदंश! पुढे काय घडलं?

snakebite patients : एकाच दिवसात आठ जणांना सर्पदंश झाल्याने खळबळ उडाली. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सर्वांचे प्राण वाचले.

Ulhasnagar News

Ulhasnagar News

मिथिलेश गुप्ता

28 Jun 2026 (अपडेटेड: 28 Jun 2026, 08:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकाच दिवसात 8 जणांना सर्पदंश झाल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ

point

डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सर्वांचे प्राण

snakebite patients : पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकाच दिवसात तब्बल आठ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार करून सर्व आठ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. सर्पदंश झालेल्यांमध्ये चार वर्षांची एक चिमुकली, आठ वर्षांचा एक मुलगा, तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : शिंदेंच्या आमदाराचा 'टक्केवारीचा' कथित Video प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई?

सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश

अंबरनाथ, उल्हासनगर, वांगणी, मुरबाड, टिटवाळा आणि कर्जत या भागांतील हे सर्व रुग्ण उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने प्रत्येक रुग्णाची तपासणी केली. सर्पदंशाचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले.

हेही वाचा : TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट

यातील काही रुग्णांना विषारी सापाने दंश केला होता, तर काहींना बिनविषारी सापाने दंश केला होता. रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी आवश्यक औषधोपचार केले तसेच गरजेनुसार अँटी-स्नेक व्हेनमही देण्यात आले. वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे सर्व आठ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

'अशा' ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शेत, झाडी किंवा ओलसर ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते, असा संदेश या घटनेतून समोर आला आहे.