आळंदी: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी आळंदीमध्ये लाखो भाविक आणि वारकरी येतात. आता, याच वारकरी आणि भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व स्वयंपाकासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा आदेश लागू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
नदी पात्रातील पाणी दूषित होण्याची शक्यता
खरं तर, या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये लाखो भाविक आणि वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. नागरिकांच्या गर्दीमुळे इंद्रायणी नदी पात्रातील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून हे आदेश देण्यात आले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यास आणि स्वंपाकासाठी वापरण्याकरीता सक्त मनाई असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: लिव्ह-इन-पार्टनरसोबत मैत्री करून देण्यासाठी बॉसचा दबाव! दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नदी पात्रातील पाणी पिण्यास आणि स्वंपाकासाठी वापरण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली असली तरी, या नदीचे पाणी भांडी घासणे किंवा तत्सम कामांसाठी वापरता येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, आळंदीतील सार्वजनिक पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे आणि इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणीही कपडे धुवू नयेत, असे देखील जिल्हाधिकारी डूडी यांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा: पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना पत्नीचा मृत्यू, दोघांना एकाच चितेवर अग्नी; सोलापुरातील घटना
आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचं उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 131 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डूडी यांनी दिला आहे. प्रशासनाकडून वारकरी व नागरिकांना सहकार्य आवाहन करताना इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











