पिंपरी-चिंचवड: मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले. बचाव पथके अथक प्रयत्न करत असताना आणि पीडित कुटुंबीय उत्तरांच्या प्रतीक्षेत असताना सोशल मीडियावरून बरीच टीका केली जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य, समन्वय, चौकशी सुरू करण्यात आली.
ADVERTISEMENT
या संपूर्ण प्रयत्नांचे नेतृत्व आयएएस अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. जवळपास 84 तास अखंड ते स्वतः बचावकार्यावर लक्ष ठेवत होते. त्यांनी तांत्रिक अहवालांचा आढावा घेतला, विविध विभागांमध्ये समन्वय साधला आणि प्रत्येक निर्णय संवेदनशीलता तसेच कायदेशीर पारदर्शकता राखून घेतला.
या संपूर्ण संकटाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले. त्यांनी प्रशासनाकडून नियमित माहिती घेतली आणि पीडित कुटुंबांपर्यंत सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य दिले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सरकारची भूमिका केवळ नियमित प्रशासकीय प्रक्रियांपुरती मर्यादित राहू नये. पीडित कुटुंबांना वेळेवर मदत मिळावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाने कायदेशीर, आर्थिक, प्रशासकीय आणि मानवीय अशा सर्व स्तरांवर प्रयत्न करावेत.
राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यातील या प्रभावी समन्वयामुळे मदतकार्य, चौकशी आणि प्रशासकीय निर्णय एकाच वेळी वेगाने पुढे सरकले.
डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने पीडित कुटुंबांना आर्थिक मदत, आवश्यकतेनुसार रोजगार सहाय्य आणि पात्र कुटुंबांना संबंधित बिल्डरकडून 25 लाखांहून अधिक अतिरिक्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मदत केवळ कायदेशीर तरतुदींपुरती मर्यादित राहिली नाही.
अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबांच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे, प्रत्येक प्रशासकीय प्रक्रियेत त्यांना मदत करण्याचे आणि अनावश्यक अडथळे दूर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मदतकार्य सुरू असतानाच प्रशासनाने कायदेशीर आणि विभागीय कारवाईलाही सुरुवात केली. डॉ. सूर्यवंशी यांनी घटनेनंतर तात्काळ संबंधित कंत्राटदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
चौकशी पुढे जात असताना त्यांनी मुख्य अभियंता-२ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आळहाट यांच्याकडील पर्यावरण विभागाशी संबंधित जबाबदाऱ्या काढून त्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवल्या, जेणेकरून चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल.
घटनेनंतर लगेचच डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आणि स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे नेतृत्व केले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी भारतीय लष्कराची मदत मागितली. त्यांच्या विशेष कौशल्य आणि अत्याधुनिक उपकरणांमुळे बचावकार्याला मोठी गती मिळाली.
त्यांच्या थेट देखरेखीखाली जवळपास 84 तास अखंड बचावमोहीम सुरू राहिली. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस, पीएमआरडीएची बचाव पथके आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांनी एकत्रितपणे जीव वाचवण्यासाठी आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना सूर्यवंशी संकट व्यवस्थापन, तातडीचे प्रशासकीय निर्णय आणि लोककेंद्रित प्रशासनामुळे व्यापक प्रशंसा मिळवली होती. कठीण निर्णय घेतानाही पारदर्शकता राखण्याच्या त्यांच्या शैलीमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
मोशी दुर्घटना पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील एक वेदनादायी अध्याय राहील. पीडित कुटुंबांसाठी न्याय हा केवळ चौकशी किंवा नुकसानभरपाईपुरता मर्यादित नसतो. तो यामध्येही असतो की, सर्वाधिक गरज असताना राज्य त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहिले.
ADVERTISEMENT












