Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील सुमनांजली हॉस्पिटलजवळ पोह्यात मीठ जास्त झाल्याचे सांगणाऱ्या एका रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोह्याची गाडी चालवणाऱ्या आरोपींनी ग्राहकावर केलेल्या या अमानवी कृत्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगताच डोक्यात तवा घातला
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रिक्षाचालक विजय प्रल्हाद चव्हाण (वय 23, रा. आनंदनगर, गारखेडा) हे 2 जून रोजी मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान आपली रिक्षा उभी करून आरोपी अक्षय शिंगारे याच्या पोह्याच्या गाडीवर नाष्त्यासाठी गेले होते. त्यांनी पोहे खाल्ल्यानंतर त्यामध्ये मीठ जास्त असल्याचे अक्षयला सांगितले. आपल्या पदार्थातील त्रुटी सांगितलेली अक्षयला सहन झाली नाही आणि रागाच्या भरात त्याने थेट आपल्या हातातील हँडल असलेल्या लोखंडी तव्याने विजय यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला.
हेही वाचा : Monsoon Update: 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार.. मान्सूनची दमदार हजेरी, थोड्याच वेळात कोसळधार!
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
केवळ एवढ्यावरच न थांबता, त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन आरोपीनेही हिंसक पवित्रा घेत हातात दगड उचलला. त्याने तो दगड विजय यांच्या डोक्यात आणि हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. या संपूर्ण घटनेचे चित्रण तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केले, जो व्हिडिओ आता सर्वत्र पसरला आहे. गंभीर जखमी झालेल्या विजय चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस तपासादरम्यान मुख्य आरोपी अक्षय शिंगारे याचा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे, ज्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिसांनी अक्षयला तात्काळ अटक केली असून अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. एका सामान्य ग्राहकाने आपल्या हक्काने केलेल्या तक्रारीचा असा हिंसक बदला घेतल्याने या घटनेने सामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT











