Jalana News, गौरव साळी : बेकायदेशीर बांग्लादेशींचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेत आहे. अशातच जालन्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. जालन्यातील एका देहविक्रय अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी 4 महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. जालना शहरातील बसस्थानक परिसर गेल्या काही काळापासून अनैतिक व्यवसायांसाठी चर्चेत आहे. तिथे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी छापेमारी केली. बसस्थानकापासून दीड किलोमीटरच्या परिघात असलेल्या 24 लॉजपैकी दोन लॉजवर पोलिसांनी ही धडक कारवाई केली, ज्यामध्ये 7 पुरुषांसह 13 महिलांना ताब्यात घेण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : प्रेग्नंट प्रेयसीला संपवण्यासाठी प्रियकराने रचला भयानक कट, आधी विषारी पाणीपुरी खाऊ घातली मग जंगलात नेऊन...
राष्ट्रगीत गाता आले नाही
चौकशीदरम्यान यातील चार महिलांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून पोलिसांना संशय आला. सुरुवातीला या महिलांनी स्वतःला भारतीय नागरिक असल्याचे सांगत वैध कागदपत्रे असल्याचे दावे केले. मात्र, त्यांनी सादर केलेले आधार कार्ड तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. पोलिसांचा संशय बळावल्यावर त्यांनी या महिलांना भारताचे राष्ट्रगीत म्हणायला सांगितले, परंतु त्यांना राष्ट्रगीत गाता आले नाही. अखेर कडक चौकशीनंतर या महिलांनी आपण बांगलादेशी नागरिक असून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.
याआधी मुंबई अन् पुण्यात वास्तव्य
तपासात असे समोर आले आहे की, या महिला जालना येथे येण्यापूर्वी मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये वास्तव्यास होत्या. आपली खरी ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्ड आणि बनावट सिम कार्डचा वापर केला होता. मानवी तस्करीच्या माध्यमातून त्यांना जालन्यात आणले गेल्याचा संशय पोलिसांना आहे. या महिलांकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, पुराव्यांच्या आधारे त्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क आणि यामागील मोठ्या रॅकेटचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा : मेहुण्याला मटण खायला बोलवलं अन् डोक्यात तवा घालून केली हत्या, नेमकं काय घडलं?
पोलिस प्रशासनाने काय सांगतिले?
सध्या या आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या महिला बांगलादेशातून भारतात नेमक्या कोणत्या मार्गाने आल्या आणि त्यांना जालन्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीवर आणि अवैध घुसखोरीला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT











