Jalgaon mumbai nagpur highway bypasse flyove mbankment collapse : जळगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचल्याची माहिती समोर आलीये. पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बायपासजवळ हा प्रकार घडलाय. पहिल्याच जोरदार पावसात उड्डाणपुलाजवळ तडे जाऊन भराव खचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बायपासवरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा बायपास अवघ्या वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे इतक्या कमी कालावधीतच भराव खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "वडिलांना फक्त 60 हजार पगार, मग अभिजीत शिक्षणासाठी अमेरिकेत कसा गेला?"
अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना
घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी, इतर शासकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी झालेल्या पाहणीत दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं
दोन्ही मंत्र्यांकडून तीव्र नाराजी, कारवाई होणार?
पाहणीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे आणि त्वरित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
याच वेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संबंधित कंत्राटदारावर कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली असून यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बायपासवर पहिल्याच मोठ्या पावसात भराव खचल्यामुळे संबंधित कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT












