Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (डीप डिप्रेशन) महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र ताशी 15 किलोमीटर वेगाने पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकत असून, सध्या ते विदर्भ आणि लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड सीमेजवळ महाराष्ट्राच्या अगदी समीप पोहोचले आहे. यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या सरी
या हवामान बदलांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 'रेड', 'ऑरेंज' आणि 'येलो' अलर्ट जारी करण्यात आले आहेत. नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसराला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, ठाणे, रायगड आणि सातारा घाट परिसरात 'ऑरेंज अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर तसेच विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि मराठवाड्यातील जालना, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हे ही वाचा : Personal Finance: महिन्याला 2 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांनी कोणती चूक टाळावी?
1 ऑगस्टनंतर काही काळ पावसाची विश्रांती?
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, तर काही भागांत सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकून त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल. परिणामी, शनिवारनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होऊन पाऊस काही काळ विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ‘मला तर शिव्या दिल्या पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा.., आपल्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात?’, PM मोदींचा नवा Insta Reel
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ज्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तिथल्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, अत्यंत महत्त्वाचे काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' करून सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












