Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (डीप डिप्रेशन) विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्प ओढून घेत असल्याने ढगांची निर्मिती होऊन मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत विदर्भात विशेषतः नागपूर आणि लगतच्या भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. हे क्षेत्र 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पश्चिमेकडे सरकत असून, सध्या छत्तीसगड, ओडिसा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सक्रिय आहे.
ADVERTISEMENT
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड ओलांडून मध्य प्रदेशच्या दिशेने प्रवास करेल. चक्रीवादळापेक्षा कमी तीव्र पण सर्वसाधारण कमी दाबाच्या पट्ट्यापेक्षा जास्त प्रभावी असणारी ही प्रणाली मध्य भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस खेचून आणत आहे. याच्या थेट प्रभावामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थितीसारखी स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा : संजय राऊत फिल्म बनवणार, संसदेतच घोषणा, भाषण करत असताना जोरदार राडा
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मराठवाड्यातील काही भागांत 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Maharashtra weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचा हाहाकार, IMD चा मोठा अलर्ट
कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
शुक्रवारी (31 जुलै) विदर्भातील पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता असली, तरी उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात 'ऑरेंज अलर्ट' कायम राहील. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट असेल. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, ही प्रणाली वेगाने पुढे सरकत असल्याने हवामानातील अलर्ट्स सातत्याने अपडेट केले जात आहेत, त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
ADVERTISEMENT












