Jalna Crime News : जालन्यात मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. अंबड तालुक्यातील रुई येथील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. विशाल दिलीप राजगुरू असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "तू काळा आहेस, माझ्या लायकीचा नाहीस...", पत्नीला सौंदर्याचा गर्व; अन् हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील रुई येथे आज सकाळी दिलीप धुराजी राजगुरू यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. उष्णतेमुळे ते गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळा, तोंड आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ तीर्थपुरी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृताच्या शरीरावर कुऱ्हाडीचे वार आढळून आले. या प्रकरणी प्रल्हाद राजगुरू यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मयत दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र, हा निर्णय मुलगा विशाल याला मान्य नव्हता. वडिलांच्या या निर्णयाचा राग मनात धरून विशालने एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











