Jayant Patil : निलेश राणेंसह अजित पवारांचा घेतला समाचार; जयंत पाटलांचे भाषण चर्चेत

भागवत हिरेकर

18 Feb 2024 (अपडेटेड: 18 Feb 2024, 05:49 PM)

Jayant Patil Ajit Pawar Nilesh Rane : जयंत पाटील यांनी निलेश राणे आणि अजित पवारांबद्दल व्यक्त केली नाराजी.

निलेश राणेंकडून शिविगाळ, जयंत पाटलांचं भाषण चर्चेत

what did jayant patil said about ajit pawar and nilesh rane?

follow google news

Jayant Patil Nilesh Rane Ajit Pawar : चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला. या कार्यक्रमानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सार्वजनिक कार्यक्रमातच शिविगाळ केली. या प्रकरणावरून आज (18 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंत व्यक्ती केली. त्यांनी अजित पवारांनाही चिमटा काढला. 

हे वाचलं का?

लातूर येथे विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "विलासराव देशमुख असते, तर काँग्रेस आज अधिक संपन्न, अधिक सामर्थ्यवान झाली असती. विश्वजित कदम, सतेज पाटलांनी आग्रह केला आहे की, नवे नेतृत्व म्हणून अमित देशमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे यावे." 

"एकेकाळी भक्कम अशी काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती. माझं आजही असं मत आहे की, ती विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामुळेच होती", असे मत जयंत पाटील यांनी मांडले. 

निलेश राणेंची शिविगाळ, पाटील काय बोलले?

माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना केलेल्या शिव्यांच्या प्रकाराबद्दल जयंत पाटील म्हणाले, "आज राजकारण बदलेलं आहे. राजकारणात विचार लोप पावलेले आहेत आणि मोठंमोठ्या नेत्यांची मुलं आता शिव्या देण्यापर्यंत पोहोचली आहेत." 
"आपल्यापैकी किती जणांनी ऐकलं असेल, मला माहिती नाही. पण, एखाद्यावर संताप व्यक्त करताना किती खालच्या दर्जाला राजकारण जातं आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता कुठेतरी थांबलेलं बरं", अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

"किती खालच्या थरावर जाऊन राजकारण होतंय. किती गुंडगिरी महाराष्ट्रातील राजकारणात शिरत आहेत, याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यात दिसायला लागली आहेत.  माझी लातुरकरांना विनंती आहे की, या लातूरने महाराष्ट्रातील काँग्रेसला सतत तेज आणि ताकद देण्याचं काम केलं आहे. या लातूरने महाराष्ट्राला काँग्रेस ठामपणे उभी आहे, सिद्ध करून दाखवलं आहे", असंही जयंत पाटील म्हणाले.  

"राजकारणासाठी पडेल ते करण्याची तयारी आता काही लोकांची झाली आहे. काँग्रेसचं बरंय... काका पुतण्या नातं तुम्हाला धार्जिणे दिसतंय. दिलीपराव देशमुख इतक्या उत्तमपणे नेतृत्व करत आहेत. पण, त्यांचे आणि अमित देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संबंध सुद्धा तितकेच मधूर आहेत. शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं, तरी चालते. पण, व्यक्तिगत नाते तोडण्याची भूमिका कुणी राजकारणासाठी घेता कामा नये, पण आता त्याही गोष्टी व्हायला लागल्या आहेत", असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

    follow whatsapp