नागपूर : गौराई विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांसोबत आक्रित घडलं, संपूर्ण गाव हळहळलं!

योगेश पांडे

16 Sep 2026 (अपडेटेड: 16 Sep 2026, 02:43 PM)

Nagpur News : नागपूरच्या काटोल तालुक्यातील झिल्पा गावात गौराई विसर्जनावेळी 13 वर्षीय 2 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. आयुष कुमरे आणि दर्शन लाड अशी मृतांची नावे असून दोघेही जय भवानी क्रीडा मंडळाचे कबड्डीपटू होते.

Nagpur News

Nagpur News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : गौराई विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांसोबत आक्रित घडलं

point

संपूर्ण गाव हळहळलं!

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील झिल्पा गावात गौराई विसर्जनावेळी दुर्दैवी घटना घडली. तलावात बुडून  13 वर्षीय दोन बालकांचा मृत्यू झाला. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड अशी मृत बालकांची नावे आहेत. दोघेही कुटुंबातील महिलांसोबत गौराई विसर्जनासाठी तलावावर गेले होते. विसर्जनावेळी पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

दोघांनाही पाण्याबाहेर काढले, पण जीव गेला 

आयुष कुमरे हा आठवीच्या वर्गात शिकत होता. तर दर्शन लाड हा सातवीच्या वर्गात शिकत होता. गौराई विसर्जन सुरू असताना दोघेही तलावाच्या पाण्यात बुडाले. ही बाब लक्षात आल्यानंतर दोन्ही बालकांचे काका पाण्यात उतरले. त्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यानंतर दोन्ही बालकांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन्ही बालकांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही बालकांना मृत घोषित केले. या घटनेमुळे झिल्पा गावावर शोककळा पसरली आहे. आयुष आणि दर्शन हे दोघेही जय भवानी क्रीडा मंडळाचे कबड्डीपटू होते. दोन्ही बालकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौराई विसर्जनासाठी गेलेल्या दोन्ही बालकांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची नोंद काटोल पोलिसांकडून करण्यात आली आहे. आयुष कुमरे आणि दर्शन लाड यांच्या मृत्यूने झिल्पा गावातील नागरिकांमध्ये शोकाचे वातावरण आहे. दोन्ही बालकं जय भवानी क्रीडा मंडळाकडून कबड्डी खेळत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह क्रीडा मंडळावरही दुःखाचे सावट पसरले आहे.