Nanded News : नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्परावपेठ या दुर्गम भागातील तरुणाचे 3 ऑक्टोबर रोजी दुबईत निधन झाले होते. श्याम अंगरवार (वय 28) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी तो मजुरी करण्यासाठी दुबईला गेला होता. तिथं त्याचा आजारी पडून मृत्यू झाला. त्याच्या परिवारातील सदस्य हे शेतमजुरी करत असल्याने मृतदेह गावी परत कसा आणायचा? या विवंचनेत संपूर्ण कुटुंब होते. दरम्यान, आमदार भीमराव केराम यांनी ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली त्यानंतर सूत्र हलली अन् मयत तरुणाचा मृतदेह 12 ऑक्टोबर रोजी मूळ गावी आणण्यात आला. आमदार भीमराव केराम व सरकारने लक्ष घातल्यामुळे कुटुंबीयांना मुलाचे शेवटचे दर्शन झाले.
ADVERTISEMENT
नांदेडमधील मजूर तरुणाचा दुबईत मृत्यू
नांदेडच्या किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे तेलंगणा सीमेवरील शेवटच्या टोकावरचे मौजे अप्पारावपेठ येथील एका गरीब शेतमजूर कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढावला. परिवारातील श्याम यादगिरी अंगरवार (वय 28) हा तरुण काही महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात विदेशात (दुबई येथे) गेला होता. परंतु तेथे तो आजारी पडला आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा मृतदेह मूळ गावी अप्पाराव पेठ या ठिकाणी पोहोचला. या घटनेने अप्पारावपेठ सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सदर घटनेची माहिती अप्पारावपेठ येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत अरंडकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आमदार भीमराव केराम यांच्याकडे धाव घेतली आणि मृतदेह मायदेशी आणण्यासाठी मदत मागितली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार भीमराव केराम यांनी तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस द्वारे या गरीब कुटुंबाच्या वेदनेची जाणीव करून दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाशी स्वतः संपर्क साधून दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना तातडीने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.
अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांना सतत लक्ष ठेवण्याचे सूचना दिले. तर दुसरीकडे नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही आवश्यक ती व्यवस्था करून दिली. त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही दिवसांत मृतदेह दुबईहून स्वदेशी जन्मभूमी आपारावपेठ येथे आणण्यात यश आले. या सर्व कामी लागणारा आर्थिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या माध्यमातून दिला. त्यामुळे आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर श्याम अंगरवार यांचा पार्थिव शरीर 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ जन्मगावी अप्पारावपेठ येथे पोहोचला. गावातील सर्व समाजबांधव, नातेवाईक परिवार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
