Maharashtra Govt Jobs : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये 'चौकीदार (गट-ड)' या पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 416 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व पदे राज्यभरातील विविध दुर्गम व आदिवासी भागांतील शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेसाठी भरली जाणार आहेत.
ADVERTISEMENT
अर्जाची शेवटची तारीख
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 एप्रिलपासून झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 मे रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी अर्जासाठी tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. अर्जासोबतच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील 18 मे हीच निश्चित करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीय, ओबीसी, अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
हे ही वाचा : बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगून थकला, शेवटी 20 हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन पोहोचला बँकेत; नेमकं काय घडलं?
'इतका' पगार मिळणार
निवड पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर, ही भरती 'संगणक आधारित ऑनलाइन परीक्षे'द्वारे (CBT) घेतली जाणार आहे. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असून यासाठी 120 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. परीक्षेचे माध्यम पूर्णतः मराठी असेल. उमेदवाराला पात्र ठरण्यासाठी या ऑनलाइन परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेची गणना 27 एप्रिल 2026 या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत केली जाईल. त्यामुळे ज्यांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत, असेच उमेदवार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. या पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर 15 हजार ते 47 हजार 600 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार असल्याचे अधिकृत जाहिरातीत म्हटले आहे.
हे ही वाचा : मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?
'या' भागातील उमेदवारांनाही संधी
उमेदवारांसाठी वास्तव्याच्या अटी देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अर्जदार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवास (Domicile) असलेला असावा. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावांमधील उमेदवारही यासाठी पात्र असतील, मात्र त्यांच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिवास दाखला असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











