नाशिकहून भावाला भेटायला परभणीत आला, पण उष्माघाताने तरुणाचा जीव गेला, हात करपले; नाका तोंडातून रक्त

मुंबई तक

27 Apr 2026 (अपडेटेड: 27 Apr 2026, 08:59 AM)

Parbhani News : नाशिकहून परभणीला भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. नांदखेडा रोड परिसरातील एका खड्ड्यात शिवाजी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Parbhani News

Parbhani News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नाशिकहून भावाला भेटायला परभणीत आला

point

पण उष्माघाताने तरुणाचा जीव गेला, हात करपले; नाका तोंडातून रक्त

Parbhani News : परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी नोंदवला गेला आहे. नाशिक येथून परभणीत आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय शिवाजी बबन कांबळे या व्यक्तीचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना परभणीतील नांदखेडा रोड भागात घडली आहे. शिवाजी कांबळे हे मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी असून कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.

हे वाचलं का?

साडूच्या घरी जाताना चक्कर आली आणि खड्ड्यात कोसळले

शिवाजी कांबळे हे 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी मिनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याचे त्यांच्या मुलीने पाहिले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे यांना दिली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर, मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला.

तीव्र उन्हाने शरीर पोळले; पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उन्हाच्या तीव्रतेने परभणीतील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन

परभणीत सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून दिवसभर कडक ऊन पडत आहे. शिवाजी कांबळे यांचा मृत्यू चक्कर येऊन खड्ड्यात पडल्याने आणि दिवसभर तीव्र उन्हात राहिल्याने उष्माघातामुळे झाल्याचे प्राथमिक दर्शनी स्पष्ट होत आहे. या घटनेने परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ऐन दुपारी ही घटना घडल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिवाजी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईत 12 वर्षाच्या मुलीची छेडछाड, अश्लील व्हिडिओ दाखवून डिलिव्हरी बॉयचा संतापजनक प्रकार