Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?

Monsoon Rain Alert: मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो अखेर आला आहे. मान्सूनने मुंबईत (Monsoon in Mumbai) दमदार एन्ट्री केली असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

mumbai monsoon update 2026 monsoon finally arrives where are rain warnings issued imd alert for maharashtra 24 june 2026 weather

प्रातिनिधीक फोटो

मुंबई तक

• 07:00 AM • 24 Jun 2026

follow google news

मुंबई: राज्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. नैऋत्य मान्सूनने आता महाराष्ट्रातील सुमारे 75 टक्के भूभाग व्यापला असून उर्वरित भागातही पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक दिवस रखडलेल्या मान्सूनने आता वेग घेतल्यामुळे राज्यभर पावसाचे अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

हे वाचलं का?

रखडलेला मान्सून अखेर वेगात

जूनच्या पहिल्या दहा दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र कोकणात आल्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावली होती. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आवश्यक वातावरण निर्माण होत नसल्याने मान्सून पुढे सरकत नव्हता. आता मात्र दोन्ही बाजूंनी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सूनने पुन्हा वेग पकडला आहे.

सध्या विदर्भातील काही भाग वगळता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील बहुतांश भाग मान्सूनच्या प्रभावाखाली आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्येच मान्सूनची पूर्ण ताकद अद्याप पोहोचलेली नाही.

सॅटेलाइट चित्रांमधून स्पष्ट संकेत

हवामान तज्ज्ञांनी शेअर केलेल्या सॅटेलाइट चित्रांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झालेली दिसत आहे. अरबी समुद्रातून येणारे दमदार वारे आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पुढील काही दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगांचे घनदाट आवरण दिसत असून यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारी भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहू शकतो.

कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीला रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवार आणि गुरुवारीही पावसाची साथ

बुधवारी रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि सातारा घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारीही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून रायगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भालाही दिलासा

धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातही पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असला तरी अकोला आणि अमरावती येथे उष्णतेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील आठवडा राज्यासाठी सकारात्मक

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील एक ते दीड आठवडा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होणार असून पाण्याची टंचाई भासत असलेल्या भागांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सध्या महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्येही मान्सून सक्रिय झाला असून देशाच्या मध्य आणि पूर्व भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

एकूणच, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सूनने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले असून पुढील काही दिवस राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.