Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्धवस्त झालंय. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास महापूराने हेरावून घेतलाय. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरु झालंय. काही दिवसांपूर्वी बार्शीतील दोन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं होतं. आता छत्रपती संभाजीनगरमधून शेतकरी आत्महत्येची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याच्या पत्नीनेही शुक्रवारी (दि.29) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
ADVERTISEMENT
विहिरीत उडी मारुन पत्नीची आत्महत्या, नवऱ्यानेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं
फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. विलास रामभाऊ जमधडे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच या शेतकऱ्याच्या पत्नीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचना आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा यातून या दाम्पत्याने आयुष्य संपवल्याची माहिती समोर आहे. मात्र, दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या दोन्ही मुलांचं आयुष्य अंधारात ढकललं आहे.
व्हाट्सअॅपवर काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने एका व्हाट्सअॅप ग्रुपवर मेसेज केला होता. यामध्ये त्याने मुलांना आवाहन केलं होतं. "माझ्यावर बँकेचं पीक कर्ज आहे. त्यामुळे मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. माझ्या बायकोनेही पीक कर्जामुळे काल आत्महत्या केली आहे. सुमित आणि अमित माझ्या मुलांनो माझी शेवटची इच्छा म्हणून आळंद येथे राहून तुमचं शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले..." असा मेसेज शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलाय. दरम्यान, दाम्पत्याने दोन दिवसांत आयुष्य संपवल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, आई-वडिलांच्या आत्महत्येमुळे दोन मुलांच्या डोक्यावर मायेचं छत्र हरपलंय.
ADVERTISEMENT
