Crime News : दिराने आपल्या विधवा वहिनीचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गया जिल्हा हादरून गेला आहे. समुद्री कुमारी (वय 20) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. दिराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हत्या केली. विशेष म्हणजे, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून जंगलातील एका नाल्यात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी दीर आदित्य भारती याला बेड्या ठोकल्या आहेत, तर त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. येथील इमामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
लग्नानंतर काही महिन्यातच पतीचे निधन आणि दिराचा क्रूर कट
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्री कुमारीचा विवाह 2024 मध्ये परमिला भारती यांच्याशी झाला होता. मात्र, संसाराची गाठ बांधल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पतीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर खचलेली समुद्री आपल्या आईकडे माहेरी राहत होती. 3 मार्च रोजी तिचा दीर आदित्य याने तिला फोन करून राणीगंज येथे भेटीसाठी बोलावले. पतीच्या घरच्या माणसाने बोलावल्यामुळे ती विश्वासाने घराबाहेर पडली, मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी आठवडाभर तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता न लागल्याने अखेर 9 मार्च रोजी तिच्या आईने इमामगंज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मंगळवारी सासरच्या घराच्या जवळच असलेल्या झिलमिलवा जंगलातील एका नाल्यात समुद्रीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आरोपीने मृतदेह लवकर कुजावा यासाठी त्यावर मीठही टाकले होते.
लग्नाचा हट्ट जिवावर बेतला, आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी संशयावरून दीर आदित्य भारती याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने या भयानक कृत्याची कबुली दिली. आदित्यने पोलिसांना सांगितले की, त्याची वहिनी गेल्या महिन्याभरापासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या त्रासाला कंटाळून त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. होळीच्या दिवशी त्याने तिला बहाण्याने बोलावून घेतले आणि आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने जंगलात नेऊन तिचा गळा दाबून खून केला. गुन्हा केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये म्हणून तो कामाच्या शोधात असल्याचे सांगून मोहनिया येथे निघून गेला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे.
नात्यातील विश्वास आणि माणुसकीला हरताळ फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी आधार देण्याऐवजी तिचे आयुष्यच संपवून टाकल्याने समुद्रीच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करत असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे. एका तरुणाने केवळ लग्नाचा दबाव टाळण्यासाठी स्वतःच्या वहिनीचा जीव घेतल्याने समाजातील विकृत मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











