Crime News : शेताची राखण करणाऱ्या नरेश नावाच्या 40 वर्षीय शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. बुधवारी सकाळी नरेशचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी करत असताना नरेशची पत्नी शीला हिने आपल्या चुलत दीरावर हत्येचा संशय व्यक्त करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता संशयाची सुई खुद्द पत्नीकडे वळली. फॉरेंसिक टीम आणि शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले असून, ही एक सामान्य हत्या नसून जवळच्या व्यक्तीने केलेला घातपात असल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात पोलिसांनी या गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणाचा अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
व्याहीसोबतचे अनैतिक संबंध आणि हत्येचा कट
या भीषण हत्याकांडामागचे खरे कारण जेव्हा समोर आले तेव्हा पोलीसही अवाक झाले. एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि धनारी पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा केली असता, नरेशची पत्नी शीला आणि तिचा व्याही सतपाल यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती समोर आली. पोलीस तपासानुसार, आरोपी सतपालच्या पत्नीच्या निधनानंतर त्याचे शीलाशी संबंध अधिक दृढ झाले होते. या गुप्त नात्याची भनक जेव्हा पती नरेशला लागली, तेव्हा तो या दोघांच्या मार्गात अडथळा ठरू लागला होता. वारंवार होणारे वाद आणि आपल्या अनैतिक संबंधांना पतीकडून मिळणारा विरोध संपवण्यासाठी शीला आणि सतपाल यांनी मिळून नरेशला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा भयानक निर्णय घेतला.
शवविच्छेदन अहवालाने उघड केला पत्नीचा बनाव
घटनेच्या दिवशी नरेश शेताची राखण करत असताना शीला आणि सतपाल यांनी तिथे पोहोचून त्याची गळा दाबून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर शीलाने चुलत दीरावर खोटा आरोप लावला होता, जेणेकरून पोलीस तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. मात्र, शवविच्छेदन अहवालात नरेशचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, तर शरीरावरील जखमा या संघर्षाच्या होत्या. पोलिसांनी जेव्हा शीलाची कडक चौकशी केली, तेव्हा ती कोलमडली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या व्याहीसोबतच्या संबंधांना टिकवण्यासाठी तिने आपल्याच पतीचा जीव घेतल्याचे कबूल केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या 'ब्लाइंड मर्डर' केसचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
सध्या संभल पोलिसांनी आरोपी पत्नी शीला आणि तिचा जोडीदार सतपाल या दोघांनाही अटक करून कारागृहात पाठवले आहे. ज्या देरावर सुरुवातीला आरोप करण्यात आले होते, तो या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. अनैतिक संबंधांच्या ओघात रक्ताच्या नात्याचा विसर पडून एका महिलेने आपल्याच संसाराची राखरांगोळी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे गोळा केले असून न्यायालयात या दोन्ही गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एका सामान्य शेतकऱ्याच्या हत्येचा हा बनाव पोलिसांनी ज्या कौशल्याने उघड केला, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











