Crime News : एका महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी सूद यांचा मृतदेह बुधवारी सकाळी राहत्या घरी आढळला. या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. आपल्या मुलीचा छळ केल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी पती डॉ. पियुष सूद यांच्यावर केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: 'हे' कागद नसतील तर अजिबात खरेदी करू नका तशी शेतजमीन!
पत्नीच्या नावावर कोट्यावधींचे कर्ज काढले
पीडित कुटुंबाने लावलेल्या आरोपानुसार, डॉ. पियुष सूद यांनी डॉ. मीनाक्षी यांच्या नावावर परस्पर कोट्यवधी रुपयांची कर्जे काढली होती. मीनाक्षी यांनी जेव्हा घरासाठी कर्ज घेण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना त्यांच्या नावावर सुमारे 2.5 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समजले, ज्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्याही नव्हत्या. याशिवाय, लग्नानंतर काही काळानंतरच पती डॉ. पियुष यांचे त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचेही कुटुंबाचे म्हणणे आहे. यांसारख्या कौटुंबिक कलहामुळे मीनाक्षी जुलै 2025 पासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या आणि घटस्फोट घेण्याच्या विचारात होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : सांगली : फोटोग्राफरकडून घेत होता 50 हजारांची लाच, नगरपरिषदेतील अधिकारी ACB च्या जाळ्यात
पतीवर शारीरिक अत्याचाराचेही गंभीर आरोप
माहेरच्या मंडळींनी पतीवर शारीरिक अत्याचाराचेही गंभीर आरोप केले आहेत. मीनाक्षीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुषने यापूर्वीही त्यांच्या मुलीला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला होता. मृत डॉक्टरच्या आईने सांगितले की, पती अनेकदा मीनाक्षीला मारहाण केल्यानंतर फोन करून माफी मागायचा. इतकेच नाही तर, पती आणि त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेजही पुरावा म्हणून पोलिसांकडे देण्यात आले आहे. या घटनेच्या दिवशी पोलिसांनी बंद दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला, तर आरोपी पतीचा फोन सध्या बंद असून तो पोलिसांच्या हाताला लागलेला नाही.
सध्या जालंधर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलीस अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले की, कायदेशीर प्रक्रिया सुरू असून आरोपीची चौकशी होणे बाकी आहे. मीनाक्षी यांच्या कुटुंबियांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहण्यावर भर दिला असून हा घातपात आहे की आत्महत्या, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी भूमिका घेतली आहे. पीडित कुटुंबाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता फॉरेन्सिक तपासणीवर लक्ष केंद्रित करत आहेत. पंजाबमधील जालंधर येथून ही धक्कादायक घटना समोर आलीये.
ADVERTISEMENT











