Nagpur Crime News : गुजरातमधील भावनगर येथे राहणाऱ्या 31 वर्षीय तरुणाला लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक दिवस प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने त्याने नागपूरमध्ये राहणाऱ्या एका ओखळीच्या व्यक्तीकडे मुलगी शोधण्याबाबत मदत मागितली होती. काही दिवसांनी त्याला मुलगी मिळाल्याचा फोन आला आणि त्याला नागपूरला बोलावण्यात आले. त्यानुसार तो तातडीने नागपूरला पोहोचला. तेथे त्याची भेट राणी उर्फ कोमल पांडे हिच्याशी करून देण्यात आली. तिने त्याला एका तरुणीचा फोटो दाखवत तिचे नाव नम्रता मालवीय असल्याचे सांगितले. फोटो पसंत पडल्यानंतर तरुणाला कोराडी परिसरातील एका घरात नेण्यात आले. तेथे नम्रता उपस्थित होती, तसेच काही जण स्वतःला तिचे नातेवाईक असल्याचे सांगत होते. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली आणि लग्नाचा प्रस्ताव जवळपास निश्चित झाल्याचे तरुणाला वाटले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "वडिलांना फक्त 60 हजार पगार, मग अभिजीत शिक्षणासाठी अमेरिकेत कसा गेला?"
लग्नासाठी 70 हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची अट
यानंतर लग्नाच्या खर्चाचा मुद्दा पुढे करण्यात आला. लग्नासाठी 70 हजार रुपये आणि वधूसाठी सोन्या-चांदीचे दागिने द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. कोणताही संशय न आल्याने तरुणाने एटीएममधून 70 हजार रुपये काढून दिले. त्याचबरोबर दागिन्यांचीही व्यवस्था केली. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर त्याला लग्न कोराडीमध्ये नसून नागपूरच्या सीताबर्डी येथील मंदिरात होणार असल्याचे सांगण्यात आले. लग्नाचा दिवस आल्यावर तो पूर्ण तयारीनिशी मंदिरात पोहोचला. काही वेळातच विवाह सोहळा सुरू होईल, अशी त्याची अपेक्षा होती.
हेही वाचा : आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा
लग्नाच्या नावाखाली फसवणूक
मात्र, त्याच वेळी संपूर्ण घडामोडींना अनपेक्षित वळण मिळाले. एक व्यक्ती मंदिरात आला आणि मोठ्याने आरडाओरडा करत, "ही माझी पत्नी आहे, तुम्ही तिच्याशी लग्न कसे करू शकता?" असा दावा करू लागला. त्यामुळे मंदिरात गोंधळ उडाला. काय घडत आहे, हे समजण्यापूर्वीच लग्नाचा संपूर्ण बनाव उघड झाला. त्यानंतर आपण लग्नाच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडलो असल्याची जाणीव तरुणाला झाली. त्याने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान नम्रता मालवीय हिला यापूर्वीही लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अटक झाल्याचे समोर आले.
पोलीस तपास पुढे सुरू ठेवताच या संपूर्ण प्रकरणामागील कथित सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला पाचपावली परिसरातून अटक केली असून न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असून, त्यांनी आतापर्यंत किती जणांना लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे, याचाही तपास केला जात आहे. लग्नाची घाई आणि विश्वासाचा गैरफायदा घेत फोटो दाखवणे, नातेवाईक असल्याचे भासवणे, लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली पैसे आणि दागिने घेणे आणि शेवटच्या क्षणी संपूर्ण डाव उलटवणे, अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
ADVERTISEMENT












