Maharashtra Lok Sabha : मोदींची शरद पवारांबद्दल भाषा अचानक का बदलली?

राहुल गायकवाड

10 May 2024 (अपडेटेड: 10 May 2024, 05:26 PM)

PM Modi on Sharad Pawar And Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एनडीएमध्ये या असं का म्हणावं लागत आहे?

Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar were seen shaking hands at an award ceremony in Pune | Photo: ANI

Modi Sharad Pawar

follow google news

PM Modi Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरूवारी नंदुरबारमध्ये सभा झाली. या सभेत मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यानंतर ‘काँग्रेससोबत मरण्यापेक्षा एनडीएसोबत या तुमचे स्वप्न पूर्ण होतील’ असं वक्तव्य मोदींनी केलं. पुण्यातल्या सभेत पवारांना भटकती आत्मा म्हणणाऱ्या मोदींनी आता थेट त्यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींची भाषा का बदलली आहे, हेच समजावून घेऊयात.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा पार पडली. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. सुरुवातीला नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना म्हणत डिवचलं आणि त्यानंतर त्यांना थेट सोबत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणारे; त्याचबरोबर एकच दिवस आधी ठाकरेंना ‘नकली संतान’ म्हणणाऱ्या मोदींनी पवार – ठाकरेंना थेट सोबत येण्याची ऑफर का दिली? अशी चर्चा आता झाल्या आहेत.

ठाकरेंबद्दल सहानुभूती, पवारांना भटकती आत्मा

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मोदींची प्रचारातील विधानं कशी बदलत गेली ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभांच्या प्रचारांमध्ये मोदी यांनी ‘खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी’ आमच्यासोबत आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणांमधून त्यांनी त्याचा वारंवार उल्लेख केला.

हेही वाचा >> "काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...", मोदींची पवार-ठाकरेंना 'ऑफर'

तिसऱ्या टप्प्यामध्ये मोदींनी थेट पवार आणि ठाकरेंवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पुण्यातील सभेत मोदींनी पवारांना थेट ‘भटकती आत्मा’ म्हटलं, त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याच टप्पात पवारांनी कृषीमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काही केलं नाही असं देखील सांगण्याचा प्रयत्न मोदींनी केला. त्याचबरोबर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरेंना सहानभूती दाखवण्याचा प्रयत्न देखील मोदींनी केला. 

चौथ्या टप्प्यात बदलली भाषा

चौथ्या टप्प्याच्या निवडणूका आता दोन दिवसांवर आहेत. यात पुन्हा मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. या सगळ्या दरम्यान पवारांचं मर्जरबाबतचं वक्तव्य आलं. त्यावरुन भाजपकडून निवडणुकीनंतर पवारांचा आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होईल असं नॅरेटिव्ह सेट करण्यास सुरुवात केली. याचाच धागा पकडत मोदींनी थेट पवार आणि ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली.

हेही वाचा >> "...त्यामुळे ते अस्वस्थ आहेत", मोदींच्या 'ऑफर'वर पवारांचं विधान 

मोदींनी ऑफर देताच पवारांनी पत्रकार परिषद घेत ‘ज्या व्यक्तीचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही असा समज लोकांचा पक्का झाला असेल त्यांच्याबरोबर असोसिएशन माझ्याकडून कधीही होणार नाही’ असं म्हणत एनडीएसोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

असं असलं तरी तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींचा सूर का बदलला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र साठे म्हणाले, 

‘महाराष्ट्रातील विरोधी वातावारण बदलण्याचा प्रयत्न मोदींनी खूप केला. त्यामुळेच दोन दिवसात सहा सभा आणि एकूण १२ सभा त्यांनी घेतल्या. परंतु त्यानंतरही वातावरण बदलताना दिसत नाही हे मोदींच्या लक्षात आलं. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर त्याबाबतचा अहवाल हा मोदींपर्यंत पोहचला असेल. त्यामुळे त्यांना वातावरणाचा एक अंदाज आला असेल. त्यामुळे सलोख्याची भाषा करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.' 

 

'पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यानंतर एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं, त्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी मोदींनी हे विधान केलेलं असावं. स्वतःच्या विरोधातील सूर त्यांना आटोक्यात येत नसल्याचं लक्षात आल्याने त्यांनी सूर बदललेला असावा,’ असं देखील साठे म्हणाले.

मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवार, संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आल्या. देशातील वातावरण बदलत असल्याने मोदी असं बोलत असल्याचं दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात मोदी ठाकरे पवारांबाबत पुन्हा सॉफ्ट काँर्नर दाखवतात की टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp